तहसीलदार कार्यालयाच्या झिजवाव्या लागतात पायऱया
प्रतिनिधी /बेळगाव
‘सरकारी योजना तुमच्या दारी’ अशी घोषणा शासनाकडून केली जाते. मात्र सरकारी कार्यालयात फेऱया मारून चपला झिजल्या तरी योजनांचा लाभ मिळत नाही. अशा परिस्थितीचा सामना वृद्ध, विधवा व दिव्यांग पेन्शनधारकांना करावा लागत आहे. जिल्हय़ातील उपतहसीलदार कार्यालयात लाभार्थींना कागदपत्रांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.
विधवा, दिव्यांग आणि वृद्धांना आर्थिक साहाय्यधन म्हणून दरमहा पेन्शन दिली जाते. मात्र पेन्शन सुरु करण्यासाठी लागणाऱया कागदपत्रांसाठी त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हय़ातील काही तहसीलदार कार्यालयांमधून अर्ज स्वीकारले जात आहेत. परंतु, लाभार्थींची गर्दी होत असल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. संकेश्वर उपतहसीलदार कार्यालयात कागदपत्रांसाठी आलेल्या लाभार्थींना बसण्यासाठी आसनाची व्यवस्था नाही. विशेषतः वृद्ध महिला आणि दिव्यांगांची कुचंबणा होत आहे. शिवाय उपतहसीलदार व इतर कर्मचाऱयांकडून सन्मानाची वागणूक मिळत नसल्याने लाभार्थींमधून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच कार्यालयात एजंटांचा सुळसुळाट असल्याने लाभार्थींना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
कामे सुरळीत करा
लाभार्थींना शासनाकडून मासिक पेन्शन दिली जाते. मात्र पेन्शन सुरु करण्यासाठी लागणारी धडपड अधिक असल्याने काहींना पेन्शनपासून वंचित रहावे लागत आहे. काही लाभार्थींची कोरोना दरम्यान पेन्शन बंद झाली होती. ते देखील पेन्शन पूर्ववतपणे सुरु करण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, कार्यालयात वेळेत कामे होत नसल्याने त्यांना फेऱया माराव्या लागत आहेत. आपली वैयक्तिक कामे सोडून दिवसभर रांगेत ताटकळत थांबावे लागत आहे. त्यामुळे तहसीलदार कार्यालयातील कामे सुरळीत करावीत, अशी मागणी जनतेतून होत आहे.