केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या आसाम दौऱयावर आहेत. मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित गृहमंत्र्यांनी गुवाहाटी येथे एका सभेला संबोधित केले आहे. संबोधनापूर्वी शाह यांनी आसाम पोलीस विभागाला ‘प्रेसिडेंट कलर पुरस्कार’ प्रदान केला. आसाम पोलिसांना हा पुरस्कार उग्रवादविरोधी मोहीम, गुन्हेगारीवरील नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था राखणे, नागरिकांचे जीवन आणि मालमत्तांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात असाधारण कामिगरीसाठी मिळाला आहे.
आसाममध्ये अफ्स्पा अंतर्गत येणाऱया क्षेत्रांचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. राज्यातील सर्व क्षेत्रांमधून अफ्स्पा हटविण्याची आमची योजना आहे. 1990 च्या दशकात आसाममध्ये अफ्स्पा लागू करण्यात आला होता आणि त्याला 7 वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. पंतप्रधान मोदींच्या 8 वर्षांच्या शासनकाळात राज्यातील 13 जिल्हय़ांना अफ्स्पामुक्त करण्यात आले आहे. तर आसामच्या 60 टक्क्यांहून अधिक क्षेत्रामधून अफ्स्पा हटविण्यात आल्याचे शाह यांनी म्हटले आहे.