उष्म्यात वाढ झाल्याने साऱ्यांची घालमेल : शेतकरी वर्ग जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत
बेळगाव : उष्म्यामध्ये वाढ झाली असताना सोमवारी दुपारी ढगांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले. मात्र केवळ 5 ते 10 मिनिटे पाऊस झाला. त्यानंतर पावसाने पुन्हा दडी मारली. यामुळे उष्म्यामध्ये आणखी वाढ झाली. परिणामी पुन्हा साऱ्यांचीच घालमेल वाढली आहे. दमदार पाऊस पडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. पण वारंवार पाऊस अपेक्षाभंग करत आहे. काही ठिकाणी पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या तरी म्हणावा तसा पावसाला जोर नसल्याचे दिसून आले. पाऊस पडला तरच उष्मा कमी होणार आहे. याचबरोबर पाण्याची टंचाईही दूर होणार आहे. पण गेल्या 15 दिवसांपासून पाऊस हुलकावणी देत आहे. एक-दोन पाऊस वगळता यावर्षी वळिवाने आतापर्यंत दमदार हजेरी लावलीच नाही. परिणामी उष्मा जैसे थे राहत आहे. उन्हाच्या झळा आणि वाढलेला उष्मा यामुळे अक्षरश: साऱ्यांचीच घालमेल होत असून अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. एसी, फॅन याचा आधार घ्यावा लागत असला तरी त्याचाही म्हणावा तसा उपयोग होत नसल्याचे दिसून येत आहे. उष्म्याचे बळीही देशामध्ये पडत आहेत. बेळगावमध्येही वाढलेला उष्मा पाहता आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची भीती व्यक्त होत आहे. अतिउष्म्यामुळे साऱ्यांचाच कल थंडपेयांकडे वाढला आहे. असे असले तरी दुपारच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट पसरत आहे. सोमवारी पावसाने हुलकावणी दिली. काही भागामध्ये पाऊस झाला. मात्र म्हणावा तसा जोर नव्हता. या पावसामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची काहीवेळ तारांबळ उडाली होती. मात्र केवळ पाचच मिनिटात पावसाने विश्रांती घेतल्याने आपला व्यवहार सुरू ठेवला होता.
हिंडलगा भागात पावसाच्या हलक्या सरी
हिंडलगा परिसरात सोमवार दिनांक 29 रोजी दुपारी साडेतीनच्या दरम्यान विजांच्या गडगडासह पावसाच्या हलक्या सरी पडल्या. सकाळपासूनच उष्णता जाणवत होती. तिव्र उष्णता असल्यामुळे पाऊस पडण्याचा अंदाज शेतकरी वर्ग करत होता, परंतु जोरदार पावसाची अपेक्षा असताना पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरली. या भागात एकदाही जोरदार पाऊस झाली नाही. सध्या विहिरीनी तळगाठला असून शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पिकांना पाण्याची अत्यंत आवश्यकता असून जनावरांना ओल्या च्रायाची आवश्यकता भासत आहे. पाणीच नसल्यामुळे शक्य झाले नाही. विजांच्या गडगडाट मात्र मोठा होता. परंतु म्हणाव तसा पाऊस पडला नाही हा पाऊस हिंडलगा, विजयनगर, लक्ष्मी नगर, श्रीनाथ नगर, आंबेवाडी, बेनकनहळ्ळी, सुळगा (हि) या भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्यामुळे हवेत पुन्हा उष्णता निर्माण झाली. या उष्णतेमुळे जीव हैराण होत होता. शेतकरी वर्गाला जोरदार पावसाची हजेरी हवी आहे. शेतक्रयांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
उद्यमबागमध्ये झाड कोसळले
सोमवारी दुपारी औद्योगिक वसाहत परिसरात वादळी पावसाने सुमारे पाऊन तास झोडपले. यावेळी काहीवेळ वाहतूक ठप्प झाली होती. येथील अशोक आयर्न अॅन्ड स्टील कार्पोरेट ऑफिस समोरील मोठे झाड वाऱ्याने कोसळले. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती व सुदैवाने प्राणहानी झाली नाही. सदर पावसाचे दूषित पाणी मजगाव मुख्य रस्त्यावरूनच वाहत होते. कारण नजीकच्या गटारी तुडुंब भरल्याने रस्त्यावर सर्वत्र कचरा पसरला होता. महानगरपालिकेने सर्व गटारी स्वच्छ कराव्यात, अशी उद्योजकांनी यावेळी मागणी केली आहे.