‘नमसाई करारा’वर दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी
@ नमसाई, गुवाहाटी / वृत्तसंस्था
आसाम आणि अरुणाचल प्रदेशने दशकांहून जुना सीमावाद सोडवण्यासाठी सहमती दर्शवली आहे. अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी नुकतीच ‘नमसाई करारा’वर स्वाक्षरी केली. हा करार अरुणाचलमधील नमसाई जिह्यात झाल्यामुळे त्याला ‘नमसाई करार’ किंवा ‘नमसाई समझोता’ असे नाव पडले आहे.
दोन्ही राज्यांच्या सीमा विवादात ‘नमसाई करार’ महत्त्वाचा मानला जात आहे. यापूर्वी हा वाद सर्वोच्च न्यायालयात होता, पण त्यावर तोडगा निघाला नव्हता. या वषी एप्रिलमध्ये गुवाहाटी येथे झालेल्या बैठकीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी सीमा विवाद सोडविण्यावर सहमती दर्शवली होती. या बैठकीनंतरच सीमावाद सोडवण्यास वेग आला आहे.
करारावर स्वाक्षरी केल्यानंतर सरमा यांनी ट्विट करत आम्ही वादग्रस्त गावांची संख्या 123 वरून 86 पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या मर्यादेच्या आधारे, आम्ही 15 सप्टेंबर 2022 पर्यंत उर्वरित गावे सोडवण्याचा प्रयत्न करू, असे नमूद केले. वादग्रस्त 123 गावांपैकी 37 गावांमध्ये सहमती झाली असून 86 गावांमधील तिढा अद्याप सोडवणे बाकी आहे. दोन्ही राज्य सरकारांनी अत्यंत कमी वेळात सीमावाद सोडवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून हा करार ऐतिहासिक असेल, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी स्पष्ट केले.
12 प्रादेशिक समित्या स्थापन
अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या लगतच्या जिह्यांतील 123 गावांना भेटी देण्यासाठी राज्य सरकार 12 प्रादेशिक समित्या स्थापन करणार आहे. या समित्या सर्व 12 जिह्यांतील वादग्रस्त गावांना भेटी देऊन 15 सप्टेंबरपर्यंत सरकारला अहवाल सादर करतील. त्यानंतर दोन्ही राज्यांची सरकारे या अहवालावर चर्चा करतील. अहवालावर सहमती झाल्यानंतर दोन्ही राज्ये एक मसुदा तयार करून अंतिम मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठवला जाईल.