उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बंडखोर गटाने गुरुवारी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे शरद पवार गटातील १० आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या याचिकेला दुजोरा दिला आहे.
भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद असल्याचे मान्य केल्याने आणि 6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सुनावणीसाठी दोन्ही गटांना उपस्थित राहण्याच्या सुचनेनंतर या घडोमोडी घडल्या आहेत. आता पुन्हा या मुद्द्याववरूनही पवार काका- पुतण्याची येत्या काही दिवसांत संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.
जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, अनिल देशमुख, रोहित पवार, मानसिंग नाईक, बाळासाहेब पाटील, सुनील भुसारा, संदिप क्षीरसागर आणि अशोक पवार या दहा आमदाराविरोधात अजित पवार गटाने अपात्रता संदर्भाची याचिका केली आहे. तर नवाब मलिक यांच्यावर कारवाई न करण्याचा निर्णयही अजित पवार गटाने घेतला आहे.
अजित पवार यांच्या गटाबरोबर गेल्याने शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने ४० आमदारांविरुद्ध तीन अपात्रतेच्या याचिका दाखल केल्या आहेत. पहिली याचिका 9 आमदारांविरोधात, दुसरी याचिका २० आमदारांविरोधात आणि तिसरी याचिका ११ आमदारांविरोधात दाखल करण्यात आली होती. पक्षाने निवडणूक आयोगासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे.