ऑनलाईन टीम / तरुण भारत :
जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे. ठिकठिकाणी निषेध आंदोलने सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीतही कडकडीत बंद पाळत मराठा समाजाने मोर्चा काढला. यावेळी ‘सरकारचा भरलाय घडा, अजित पवार सत्तेतून बाहेर पडा’, अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ आज मराठा संघटनांकडून बारामतीत ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. काटेवाडी येथेही सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. वरिष्ठांच्या आदेशानेच पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हेच या घटनेला जबाबदार आहेत, असा आरोप आंदोलकांनी केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्यावा, अन्यथा सरकारमधून बाहेर पडावे, अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली.