Hasan Mushrif News : मराठा समाजाच्या अनेक आंदोलनामध्ये मी स्वतः सहभागी झालो आहे. मराठा समाजाच्या लोकांना आरक्षण मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. यावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत.उद्याचा बंद शांततेने पार पाडून कोल्हापूर शहराच्या वैभवात भर पडेल अशा पध्दतीन बंद पाळावा,असं आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. आज सकल मराठा समाजाच्यावताने उद्या कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली. यानंतर मुश्रीफांनी पत्रकारांशी संवाद साधला.मराठा आरक्षणावरून एकमेकांवर दोषारोप करण्यापेक्षा त्यावर मार्ग कसा काढता येईल हे पहावे, असा टोलाही महाविकास आघाडीला लगावला.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, लोकांच्या व्यक्तिगत अडचणी, समस्या जाणून घेण्यासाठी जनता दरबार आहे.सामान्यांना वेळेत काम करून देण्याचा प्रयत्न आहे. त्यांचे हेलपाटे वाचवून लोकांना समाधान मिळवून देण्याचा उद्देश आहे. दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्ह्याचे शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांचा जनता दरबारात सहभाग असतो. एका महिन्याच्या आत प्रश्नाचे निरसन व्हावे हा प्रामुख्याने उद्देश आहे. सुरूवातीला सतेज पाटील,राजेंद्र पाटील यड्रावकर आणि मी आम्ही याची सुरुवात केली. मात्र कोरोनामुळे थांबवाव लागल. आता पुन्हा संधी मिळाली आहे.जिल्ह्यातील लोकांचे प्रश्न लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहोत असेही ते म्हणाले.
जालना लाठीचार्ज घटनेसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे. यात राजकारण करण्याची गरज नाही. काल शासनाच्या वतीने मंत्री गिरीश महाजण हे गेले होते. सातत्याने प्रयत्न सुरु आहे. लवकरच यातून मार्ग निघेल, असे मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले.