वृत्तसंस्था/ बाकू (अझरबेजान)
येथे सुरू असलेल्या आयएसएसएफच्या विश्व नेमबाजी चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताचा नेमबाज अखिल शेरॉनने पुरूषांच्या 50 मि. रायफल 3 पोझिशन नेमबाजी प्रकारात कास्यपदक मिळवून पुढीलवर्षीय होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिकचे तिकीट आरक्षित केले आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 4 सुवर्ण आणि 3 कास्यपदकांसह 7 पदके मिळविली आहेत. पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्र ठरणारा अखिल शेरॉन हा भारताचा पाचवा नेमबाज आहे.
पुरूषांच्या 50 मि. रायफल 3 पोझिशनमध्ये पदकफेरीत अखिल शेरॉन प्रारंभी 6 व्या स्थानावर होता. त्यानंतर त्याने 450 गुण नोंदवित कास्यपदक पटकाविले. या कामगिरीमुळे तो आता 2024 साली होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करेल. या क्रीडाप्रकारात ऑस्ट्रेलियाच्या स्कीमेरीने 462.6 गुणांसह सुवर्णपदक तर झेक प्रजासत्ताकच्या निंबुरेस्कायने 459.2 गुणांसह रौप्यपदक पटकाविले. या क्रीडाप्रकारात भारताच्या अखिल शेरॉनने 450 गुण नोंदवित कास्यपदक हस्तगत केले. बाकूतील ही स्पर्धा पॅरिस ऑलिंपिकसाठी पात्रफेरीची म्हणून ओळखली जाते. गेल्यावर्षी झालेल्या आयएसएसएफ विश्व नेमबाजी स्पर्धेत पुरूषांच्या ट्रॅप नेमबाजी प्रकारात बी. मेंडीरेटाने, रूद्रांक्ष पाटीलने पुरूषांच्या 10 मि. एअर रायफल नेमबाजी प्रकारात, स्वप्नील कुसाळेने पुरूषांच्या 50 मि. रायफल 3 पोझिशन प्रकारातून आगामी पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेसाठी चमुतील स्थान निश्चित केले. महिलांच्या 10 मि. एअर रायफल नेमबाजीत मेउली घोषने आपली पात्रता सिद्ध केली आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत 4 सुवर्ण आणि 3 कास्य अशी एकूण 7 पदके मिळविली आहेत. महिलांच्या 25 मि. पिस्तूल सांघिक नेमबाजी प्रकारात रिदम सांगवान, ईशा सिंग आणि मनू भाकर यांनी 1744 गुण नोंदवित सुवर्णपदक पटकाविले. अंतिम फेरीत भारताने चीन तैपैयीचा केवळ एका गुणाने पराभव केला. चीन तैपैयीने या प्रकारात रौप्यपदक तर चीनने कास्यपदक मिळविले. पुरूषांच्या 3 पोझिशन सांघिक नेमबाजी प्रकारात ऐश्वर्य प्रतापसिंग तोमर आणि निरजकुमार यांनी एकूण 1750 गुण नोंदवित भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.