वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यजमान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या तीन सामन्यांच्या वनडे मालिका खेळविली जात असून भारताने सलग दोन सामने जिंकून मालिका हस्तगत केली आहे. आता या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 27 सप्टेंबरला राजकोटमध्ये होणार आहे. भारतीय संघातील अष्टपैलू अक्षर पटेल तंदुरूस्ती समस्येमुळे खेळणार नसल्याचे भारतीय संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
यापूर्वी लंकेत झालेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत खेळताना अक्षर पटेलला स्नायू दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. बेंगळूरमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत अक्षर पटेलच्या या दुखापतीवर वैद्यकीय उपचार चालू आहेत. अक्षर पटेल तिसऱ्या सामन्यात खेळणार नसल्याने अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनवर सर्व मदार राहील. रविचंद्रन अश्विनने या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात एकूण 4 गडी बाद केले. इंदोरमधील झालेल्या दुसऱ्या सामन्यात रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाचे तीन महत्त्वाचे फलंदाज बाद केले होते. या सामन्यामध्ये शुभमन गिलने दणकेबाज शतक झळकविले. त्याचप्रमाणे श्रेयर अय्यरला फलंदाजीचा सूर मिळाल्याचे जाणवले. अय्यरने या सामन्यात शतक नोंदविले. शार्दुल ठाकुर आणि गिलला या शेवटच्या सामन्यात विश्रांती दिली जाणार असल्याने कर्णधार रोहित शर्मा, कोहली, बुमराह, हार्दिक पांड्या हे निश्चित खेळणार असल्याचे समजते.