जम्मू-काश्मीरमध्ये मोठा निर्णय ः काश्मिरी पंडितांनी दिला होता पलायनाचा अल्टीमेटम
वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरमधील टार्गेट किलिंगदरम्यान प्रशासनाने मोठा निर्णय घेत हिंदू सरकारी कर्मचाऱयांची बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मूमध्ये बदली करण्याची मागणी हिंदू कर्मचाऱयांनी केली होती. परंतु प्रशासनाने सध्या त्यांना जिल्हा मुख्यालयात आणण्याची तयारी केली आहे.
श्रीनगरमध्ये उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी वरिष्ठ अधिकाऱयांसोबत बैठक घेत हा निर्णय घेतला आहे. सर्व हिंदू कर्मचाऱयांना 6 जूनपर्यंत सुरक्षित ठिकाणी नियुक्त करण्यात येणार आहे. हिंदू, शीख किंवा केंद्रशासित प्रदेशात अल्पसंख्याक असलेल्या समुदायाच्या कर्मचाऱयाला काश्मीरमध्ये दुर्गम भागात नियुक्त न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याचबरोबर या कर्मचाऱयांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी एक ईमेल आयडी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व विभागांमधील कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱयांच्या सुरक्षेशी निगडित चिंतांवर लक्ष देण्याची गरज असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले. या कर्मचाऱयांनी एखादी तक्रार केल्यावर त्यावर त्वरित पाऊल उचलण्यात यावे असे ठरविण्यात आले आहे.
तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये हिंदू शिक्षिका रजनी बाला यांच्या हत्येप्रकरणी बुधवारीही निदर्शने करण्यात आली. रजनी यांच्या हत्येप्रकरणी निदर्शकांनी रस्त्यांवर उतरून ‘न्याय’ मिळवून देण्याची मागणी केली. प्रशासनाने 24 तासांमध्ये सुरक्षित ठिकाणी न हलविल्यास काश्मीर खोरे सोडू असा निर्वाणीचा इशारा काश्मिरी पंडितांनी दिला होता.
कुलगामच्या गोपालपोरा भागात माध्यमिक शाळेच्या शिक्षिका रजनी बाला यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. रुग्णालयात हलविण्यात येत असताना 36 वर्षीय रजनी यांनी अखेरचा श्वास घेतला होता. 20 दिवसांमध्ये दुसरी हत्या झाल्याने काश्मिरी पंडित निदर्शने करत आहेत.
भाजप नेत्याकडून चर्चा
जम्मू-काश्मीरमधील भाजप नेते रविंद्र रैना यांनी रजनी बाला यांच्या घरी जात तेथे होत असलेल्या घोषणाबाजीदरम्यान निदर्शकांशी चर्चा केली आहे. रजनी यांच्या हत्येचा सूड अवश्य घेतला जाईल. या हत्येत सामील सर्व दहशतवाद्यांना शिक्षा मिळवून देऊ, असे आश्वासन रैना यांनी दिले आहे.
केजरीवालांकडून टीकास्त्र
1990 च्या दशकाप्रमाणेच आताही जम्मू-काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांना लक्ष्य करण्यात येत आहे. काश्मिरी पंडितांना त्यांच्या घरात, कार्यालयात आणि रस्त्यांवर लक्ष्य करण्यात येत आहे. त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. हा प्रकार मानवता आणि देशाच्या विरोधातील असून तो रोखण्यासाठी कुणीच काही करत नसल्याची टिप्पणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
खोऱयात काश्मिरी पंडितांचे आंदोलन
काश्मीर खोऱयात 18 दिवसांपासून काश्मिरी पंडितांचे आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान रोजगार पॅकेज अंतर्गत नोकरी मिळविणारे काश्मिरी पंडित आता कामावर बहिष्कार टाकून निदर्शने करत आहेत. महसूल विभागातील कर्मचारी राहुल भट यांच्या हत्येनंतर ही निदर्शने सुरू झाली होती. काश्मीर खोऱयाबाहेर नियुक्ती देण्याची मागणी काश्मिरी पंडित करत आहेत.