उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद हिसकावून घेऊन भाजपने ते स्वतःकडे न ठेवता एकनाथ शिंदेंना देण्याची खेळी करून आणखी एक वज्राघात केला आहे. शिवसेनेला आता नव्याने सुरुवात करावी लागेलच. पण दिल्लीश्वरांच्या वज्राघाताने राज्यातील सर्वच राजकारणी गारद झाले आहेत.
जे छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे यांना जमले नाही ते ठाण्याच्या एकनाथ शिंदे यांनी घडवून दाखवले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा नामोल्लेख करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. त्यांचे अभिनंदन. ही महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळीच कलाटणी आहे. ही संपूर्ण खेळी दिल्लीतूनच खेळली हे आता स्पष्ट झाले आहे. उद्धव ठाकरे व शिवसेनेला त्यांनी अस्तित्वाचेच आव्हान दिले आहे. शरद पवार यांना जोराचा शह दिला आहे. काँग्रेसला निर्बल केले आहे. तर स्वतःच्याच पक्षात मोठी प्रतिमा निर्माण करणाऱया देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावून त्यांचीही उंची कमी केली आहे. यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सक्रिय वाटा होता हे आधीपासूनच जाणवत होते. ईडी आणि सीबीआय त्यामुळेच आक्रमक होती. महाराष्ट्रातील सगळे राजकारणी दिल्लीच्या राजकारणात गारद झाल्याचे या घटनेतून दिसून आले आहे.
सरकारचे काय होणार?
तीनच दिवसात विधानसभेचे एक विशेष अधिवेशन सुरू होईल. त्यावेळी या सरकारचे भवितव्य ठरणार आहे. शिंदेगटाला स्वतंत्र गट म्हणून नवे अध्यक्ष मान्यता देणार का? हेही स्पष्ट होईल. तसे झाले तर शिंदे गट कोणत्या राजकीय पक्षात विलीन होणार? शिवसेना नावातच आणखी काही शब्द वाढवून स्वतंत्र पक्षाची मान्यता मिळवणार की शिवसेनाच आमची म्हणून नव्याने ठाकरेंच्या अस्तित्वाला आव्हान देणार हे स्पष्ट होईल. पण राजकीय पक्ष, संसदीय पक्ष वेगळा असतो. त्यामुळे नवा पक्ष किंवा विलीनीकरण हाच पर्याय असेल. त्यापूर्वी आपण अपात्र ठरू नये अशी काळजी त्यांना पुढेही घ्यावी लागेल! 170 आमदारांचे नव्या शिंदे सरकारला समर्थन असल्याचे राज्यपालांकडे पत्र आहे. त्यात शिंदे यांना समर्थन दिलेल्या आमदारांची नावे उघड होतील. भाजपचे 106, अपक्ष 16 आणि उर्वरित शिवसेनेचे बंडखोर 48 आमदार असतील की अन्य छोटे पक्ष धरून तो आकडा फुगवला आहे, तेही समजेल. विधानसभेच्या अध्यक्ष निवडीत भाजपचे राहुल नार्वेकर बिनविरोध होतात का, आजच समजेल. शिवसेनेकडे 14 आमदार उरलेत. परिणामी विरोधी पक्ष नेतेपद राष्ट्रवादीला मिळेल. त्यामुळे त्यांच्या कलाने जावे लागते की तिन्ही पक्ष आपापले निर्णय घेणार ते कळेल. भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन महाविकास आघाडी पुढे प्रत्यक्षात राहते की आपोआप लयाला जात सर्वांच्या वाटा वेगळय़ा होतात, तेही समजेल. शिवसेना आणि शिवसैनिकांना संभ्रम टाकून स्वकियांविरूध्द लढावे लागणार आहे.
भाजप, शिंदेसेना वि. सेना
भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष सत्तांतरानंतर लगेचच अधिक तीव्रपणे सुरू झाला. मुंबईतील आरे मध्ये मेट्रो कारशेड बाबत मुख्यमंत्र्यांच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन कारशेड आरे मध्येच करण्याचा प्रस्ताव घेऊन येण्याचा आदेश अधिकाऱयांना देत योग्य तो संदेश दिला. लगेच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तथाकथित शिवसैनिक म्हणून शिवसेनेशिवाय शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही.
अशी भूमिका जाहीर करून गुरुवारपासूनचा संभ्रम दूर केला. तर माझ्यावरचा सूड आरे व मुंबईवर उगवू नका असे म्हणत भाजपला आव्हान दिले. अशा घटना आता वारंवार घडतील. त्यात देवेंद्र फडणवीस हेच अग्रभागी राहणार की एकनाथ शिंदे ठाकरेंना उत्तर देणार? हेही दिसून येईल.
भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन शिंदेंनी स्थापलेल्या सरकारला भाजपने पाठिंबा दिला असे दाखविण्याची केलेली खेळी आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झीरवळ यांनी 16 आमदारांना अपात्र ठरवण्याचे काढलेले पत्र या बाबींची लढाई 11 जुलैला सर्वोच्च न्यायालयात होईल. ती लढाई जिंकावी यासाठी भाजपची ही चाल आहे. अपात्रतेचा मुद्दा न्यायालयाने फेटाळून लावला तर हे सरकार अडीच वर्षे चालवण्याची जबाबदारी भाजपवर येईल. निर्णय त्यांचे आणि नाव शिंदे यांचे असे होते की पुन्हा काही संघर्ष निर्माण होतात यावर महाविकास आघाडी टपून बसणार आहे. पण त्यांना आता भाजप आणि सोबत शिंदे यांचे मोठे आव्हान आहे. भाजप दोन्ही काँग्रेस विरुद्ध आणि शिंदेगट शिवसेनेविरूध्द बोलताना दिसेल. आता सेनेचा एक प्रबळ मराठी गट मिळाल्याने भाजपच्या लेखी मनसेचे महत्वही कमी झाले आहे. त्यामुळेच राज यांनी फडणवीस यांचे कौतुक करणारे पत्र पाठवून भाजप नेत्यांना डिवचले आहे.
फडणवीसांवरच धक्का तंत्र
भाजप नेतृत्व धक्का तंत्राचा वापर करण्यास प्रसिद्ध आहे. पण दमदार कामगिरी करूनही देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते का वापरले? त्यांची उंची कमी करायची होती का याची चर्चा रंगली आहे. राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढलेली दिसल्याने नेतृत्वाने ऐनवेळी सत्तालोभी ठरु नये म्हणून देवेंद्रजींच्या ऐवजी एकनाथजींना संधी दिली. तेव्हा फडणवीस यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष किंवा मंत्री व्हावे असाही प्रस्ताव होता अशी चर्चा आहे. आपण मंत्री मंडळात असणार नाही अशी घोषणा केल्यानंतर दिल्लीत खळबळ माजली.
पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी देवेंद्रजींना उपमुख्यमंत्री बनण्याचे खुले आवाहन केले. अमित शहा यांनी तर ट्विट केले. फडणवीस तयार नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन फोननंतर त्यांच्या शब्दाखातर ते तयार झाले. महाराष्ट्रातील नेते केवळ आजचे बघत असताना दोन गुजराती नेते दिल्लीत बसून 2024 ची जुळणी आताच लावत आहेत. भविष्यात मोदी नवे धक्का तंत्र अवलंबतील तेव्हा फडणवीस मोठे दावेदार असू शकतील. त्यामुळेच दुसऱयांदा मुख्यमंत्रीपदाने त्यांना हुलकावणी दिली!
शिवराज काटकर