रॅडिसन ब्ल्यू’ हॉटेलला रक्कम अदा
@ गुवाहाटी / वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील शिवसेनेच्या गुवाहाटीत राहिलेल्या आमदारांच्या गटाने तेथील रॅडिसन ब्ल्यू या आलिशान हॉटेलचे साधारणतः 70 लाख रुपयांचे बिल चुकते केले आहे. हे बिल चुकते केल्यानंतरच त्यांनी हे हॉटेल सोडून गोव्याकडे प्रयाण केले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हॉटेल व्यवस्थापनाने मात्र अद्याप अधिकृतरित्या याविषयीही कोणतीही माहिती दिलेली नाही, असे दिसून येते.
आमदारांसाठी हॉटेलच्या 70 खोल्या 22 जून ते 30 जून या कालावधीत बुक करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हा आमदारांचा गट शिवसेनेतून बाहेर पडला होता. या गटातील 39 आमदारांसह 11 अपक्ष आमदारही त्यांच्यासोबत होते. अशाप्रकारे एकंदर 50 आमदारांचे वास्तव्य या हॉटेलात होते. 20 जूनलाच या आमदारांनी हॉटेल सोडले होते.
आमदारांच्या वास्तव्याच्या कालावधीत हॉटेल व्यवस्थापनाने हॉटेलात इतर अतिथींना प्रवेश दिला नव्हता. हॉटेलची रेस्टॉरंटस्ही बंद ठेवण्यात आली होती. एकंदरीत आमदारांनी संपूर्ण हॉटेलच बुक केले होते, असे स्पष्ट करण्यात आले होते. नेमका खर्च किती आला याची माहिती सूत्रांनी काढली आहे. या हॉटेलात राहण्याचा किंवा खाण्याचा नेहमीचा खर्च किती येतो, याची माहिती घेऊन आमदारांच्या खर्चाचे अनुमान करण्यात आले आहे. आमदारांना या हॉटेलात राहण्याच्या खोल्यांव्यतिरिक्त सभागृह, खाद्यपेयगृहे, स्पा इत्यादी सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. हा सर्व मिळून खर्च दीड कोटीच्या घरात असावा, असे अनुमान यापूर्वी व्यक्त करण्यात आले होते. तथापि, आता सूत्रांच्या नव्या अनुमानानुसार हा खर्च 68 ते 70 लाख रुपये आल्याचे स्पष्ट होत आहे.
खाण्याचा खर्च किती
या हॉटेलातील सुसज्ज खोल्यांचा प्रत्येकी दर दिवसाला साडेसात ते साडेआठ हजार रुपये आहे. यावर काही प्रमाणात डिस्काऊंट दिला जातो. तसेच काही करही लावले जातात. हे सर्व धरुन वास्तव्याचा खर्च 68 ते 70 लाख रुपये झाल्याची माहिती मिळाली आहे. याशिवाय आमदारांच्या जेवण्याखाण्याचा खर्च एकंदर 22 लाख रुपये इतका आल्याची माहिती सूत्रांनी दिली. आमदारांनी या हॉटेलात दिल्या जाणाऱया सर्वसामान्य सोयी वगळता इतर कोणत्याही सेवा घेतलेल्या नाहीत, अशी माहिती हॉटेलच्या कर्मचाऱयांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे.
पूरग्रस्तांसाठी दिले 51 लाख
हे आमदार हॉटेलात वास्तव्यास असताना आसाममध्ये पूर आला होता. पुरामुळे मोठी हानी झाली होती. अशा स्थितीत हे आमदार तेथे कशासाठी गेले असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. हे आमदार आणि भाजपवर टीकाही करण्यात आली होती. तथापि, आमदारांनी आसामच्या पूरग्रस्तांच्या साहाय्यार्थ आसामच्या मुख्यमंत्री निधीत 51 लाख रुपयांचे योगदान केल्याचे स्पष्ट करण्यात आले.