जिल्हाधिकारी व पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना व्यापारी, शेतकऱ्यांचे निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
जनावरांचा आठवडा बाजार एपीएमसी गेटच्या बाहेरच भरविण्यास दबाव आणण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना तसेच व्यापारी लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा एपीएमसीच्या आतील जागेमध्ये पूर्वीप्रमाणेच जनावरांचा बाजार भरविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पुन्हा एकदा शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी, पशु वैद्यकीय अधिकारी व एपीएमसी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी केंद्र सरकारनेच आदेश बजावल्यामुळे केवळ म्हैस विक्री व खरेदीचा बाजार भरविला जात आहे. गायी, बैल यांचा बाजार भरविण्यास अजुनही केंद्र सरकारने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे बाजार भरविणे कठिण असल्याचे एपिएमसीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यावर म्हैस विक्री खरेदीचा बाजार एपीएमसीच्या पूर्वीच्या जागेतच भरण्यास मुभा द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी केली आहे.
लम्पिस्कीन या आजारामुळे मोठ्या प्रमाणात जनावरे दगावली होती. लम्पिस्कीन हा आजार संसर्गजन्य आहे. त्यामुळे यावर निर्बंध घालणे गरजेचे झाले आहे. या आजाराची लागण गाय तसेच बैल यांना अधिक असते. त्यामुळेच अजुनही बैल व गायीच्या खरेदी विक्रीच्या बाजारावर निर्बंध घातले गेले आहेत, असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या केवळ म्हैस खरेदी-विक्री बाजारालाच परवानगी देण्यात आली आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी म्हैस विक्री करण्यासाठी यावे, असे स्पष्ट केले आहे.
यावेळी शेतकरी व व्यापाऱ्यांनी आम्ही म्हैस खरेदी व विक्री करण्यासाठी उपलब्ध राहू. मात्र आम्हाला पूर्वीच्या ठिकाणीच बाजार भरविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. यावेळी मारुती कुंडेकर, संदीप कुंडेकर, प्रवीण तेली, पप्पू धामणेकर, शंकर उप्पार, जोतिबा जाधव, सचिन जाधव, नितिन जाधव, दिलीप मोहिते, इब्राहिम बेपारी, शकील बेपारी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.