भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची माहिती : 25 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार
म्हापसा : उद्या शुक्रवार 3 मे रोजी सायंकाळी 5 वाजता म्हापसा येथील श्री बोडगेश्वराच्या पटांगणावर भाजपची जाहीर सभा होणार आहे. सभेला मार्गदर्शन करण्यासाठी संरक्षणमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असून 25 हजार कार्यकर्ते हजर राहणार आहेत. म्हापसा शहरात सभेपूर्वी भाजप कार्यकर्त्यांची रॅली होणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली. मतदानास अवघे दिवस राहिले असून प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. उमेदवार सर्व मतदारसंघात जाऊन आले आहेत. आमदार, कार्यकर्ते घरोघरी मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. शेवटच्या टप्यातील प्रचार सुरू असून सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. 70 टक्याहून अधिक मतदान करून घेण्याची तयारी आम्ही केली आहे. राज्यातील दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार, असा विश्वास तानवाडे यांनी व्यक्त केला.आज महिला सशक्तीकरण झाले असून महिलांचा भाजपला मोठा आधार आहे. त्या आता मागे राहिल्या नसून सर्व क्षेत्रात आघाडीवर आहेत. महिला भाजपची मोठी ताकद आहे. भाजप फसवेगिरी करीत नाही, पोकळ आश्वासने देत नाही तर प्रत्यक्षरित्या कृती करून दाखविली जाते याची पूर्ण माहिती महिलांना आहे, असे तानावडे म्हणाले.
सत्तर वर्षांवरील वृद्धांसाठी विमा योजना
गोवा भाजपचा जाहीरनामा आज गुऊवार 2 मे रोजी सकाळी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 70 वर्षावरील वृध्दांसाठी 5 लाखापर्यंत विमा योजना लागू करण्यात येणार आहे. राज्यात सर्वत्र भाजपचा प्रचार मोठ्या उत्साहाने सुरू आहे. दुसऱ्या बाजूने काँग्रेस उमेदवारांचे भाजप उमेदवारांवर आरोप प्रत्यारोप करणे सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 सालापासून देश विकासासाठी काम करीत आहेत. म्हणून जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे. देशात भाजपचे 400 हून अधिक उमेदवार निवडून येतील. त्यात गोव्याच्या पल्लवी धेंपे व श्रीपाद नाईक यांचा समावेश असेल, असे तानावडे यांनी सांगितले.
लांबाना संविधनावर बोलण्याचा अधिकार नाही
काँग्रेसला त्यांचा अध्यक्ष कोण हे अद्याप माहीत नाही. काँग्रेस आपल्या सत्ता काळात प्रत्येक वेळी पंतप्रधान बदलत होते, यावरून काँग्रेस पक्षामध्ये स्थिरता नसल्याचे दिसून येते. काँग्रेसची राष्ट्रीय अलका लांबा मंगळवारी संविधानावर बोलत होत्या, पण त्या संविधान मानत नाही म्हणून त्यांना संविधानावर बोलण्याचा काहीच अधिकार नाही. संविधान हे आमच्यावर लादले असे लांबा म्हणाल्या. यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान होत आहे. आम्ही देश प्रथम म्हणतो, नंतर पक्ष असे सदानंद शेट तानावडे म्हणाले.
म्हापसा अर्बनसाठी पर्रीकरांना जबाबदार धरणे चुकीचे
सध्याचे काँग्रेसचे उमेदवार रमाकांत खलप यांनी म्हापसा अर्बनचे चेअरमन असताना कोट्यावधी ऊपयांची कर्जे सर्वांना दिली. मात्र त्याची अद्याप वसुली झालेली नाही. कर्जाची वसुली होत नसल्याने रमाकांत खलप यांचे आता स्व. मनोहर पर्रीकरांवर आरोप करणे चुकीचे आहे. तुम्ही आपल्या मर्जीतील लोकांना पाहिजे तेवढे कर्ज देणार आणि वसुली होत नाही म्हणून स्व. मनोहर पर्रीकरांना जबाबदार धरणार हे चुकीचे आहे, असे तानावडे म्हणाले.