आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची स्पष्टोक्ती : काँग्रेसमध्ये असतानाही त्यांची भाजपलाच साथ
पणजी : प्रतापसिंह राणे हे राजकारणातील धुरंदर नेते आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात विकासकामांबाबत नेहमीच आघाडी घेतलेली आहे. काँग्रेसमध्ये राहूनही त्यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपचे श्रीपाद नाईक यांना पाठिंबा दिला. त्यामुळे श्रीपाद नाईक यांना सत्तरी तालुक्यात मोठे मताधिक्क्य प्राप्त झाले असून याखेपेसही मोठे मताधिक्क्य मिळणार आहे. तसेच प्रतापसिंह राणे हे भाजपलाच साथ देणार आहेत, असे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले. काल बुधवारी येथील भाजप मुख्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मंत्री राणे बोलत होते. यावेळी भाजपचे सरचिटणीस दामोदर नाईक, साळगावचे आमदार केदार नाईक उपस्थित होते.
प्रतापसिंहांचा पाठिंबा श्रीपादभाऊंनाच
मंत्री राणे म्हणाले, प्रतापसिंह राणे यांचे नेतृत्व असामान्य आहे. त्यांनी 1980 ते 1990 या दहा वर्षांच्या कालावधीत केलेला राज्याचा विकास हा त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे शक्य झाला. काँग्रेसला याचे श्रेय घेता येणे शक्य नाही. प्रतापसिंह राणे यांच्याशी माझे बोलणे झाले असून, यंदाही ते भाजपचे उत्तर गोव्याचे उमेदवार श्रीपादभाऊ नाईक यांनाच पाठिंबा देणार आहेत. यापूर्वी ते काँग्रेसमध्ये असतानाही भाजप उमेदवाराला पाठिंबा देत होते. सत्तरीत यंदाही विक्रमी मते भाजपचे उमेदवार श्रीपादभाऊंना प्राप्त होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रतापसिंह, श्रीपादभाऊंचे वेगळेच नाते
प्रतापसिंह राणे व श्रीपादभाऊ यांचे वेगळेच नाते आहे. प्रतापसिंह राणे हे सर्वमान्य नेतृत्व असल्यामुळे त्यांचे विरोधी पक्षातील नेत्यांशीही चांगले संबंध राहिलेले आहेत. प्रतापसिंह राणे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेक लोकोपयोगी विकासकामे केलीत. त्यांच्यानंतर स्व. मनोहर पर्रीकर यांनीही राज्याचा विकास गतिमान केला. आता विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे राज्याचे नेतृत्व करीत असताना सर्वांना सोबत घेऊन राज्याचा सर्वांगीण विकास करीत आहेत. पर्रीकर यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यात मुख्यमंत्री सावंत हे यशस्वी ठरल्याचेही विश्वजित राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
होय, मी संघाशी एकऊप झालोय !
काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर मी पूर्णपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) विचारधारा स्वीकारलेली आहे. मी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आरएसएसशी एकऊप होण्याबाबत शब्द दिला होता, तो मी पाळत आहे. मी पूर्णपणे आरएसएसच्या विचारधारेशी जोडलो गेलोय. हीच विचाराधारा देश मजबूत करत आहे. म्हणून मी संघाचे आणि भाजपचे काम करत आहे. कोणताही पक्ष स्वीकारताना प्रथम त्याची विचारधारा स्वीकारावी लागते आणि मी तेच केले आहे, यापुढेही करणार आहे, असे विश्वजित राणे यांनी सांगितले.