सुदैवाने चालक बचावला
वाळपई : महाराष्ट्रातून गोव्यात बेकायदेशीर रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकला वाळपई येथे झाडाला धडक दिल्यामुळे मोठा अपघात झाला. सुदैवाने चालक बचावला. मात्र गाडीची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. याबाबतची माहिती अशी की, महाराष्ट्रातून गोव्यामध्ये मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक होत असते. अशाच प्रकारची वाहतूक करणारा एक ट्रक शुक्रवारी सकाळी वाळपई दिशेने येत होता. पहाटे 5 वा.च्या सुमारास चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व ट्रकने सरळ झाडाला धडक दिली. यामध्ये ट्रकची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली आहे. मात्र सुदैवाने चालक बचावला. अन्यथा मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. सध्या महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेतीची वाहतूक होऊ लागलेली आहे. खास करून रात्री 12 नंतर व सकाळी सहा वाजण्याच्यापूर्वी ही वाहतूक होत असते. याची तक्रार करून सुद्धा पोलीस पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील रेती वाहतूकदारांनी केलेले आहे. महाराष्ट्रातून तळेखोल, रावण, पर्ये आदी भागातून ही वाहतूक होत आहे. या वाहतुकीला विरोध करणारे निवेदन रावण गावातून यापूर्वी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे. मात्र त्याची दखल अजूनपर्यंत घेण्यात आलेली नाही.