गुळे येथील मालवाहू वाहनांच्या अपघातामुळे साडेपाच तास कोंडी, रात्री 11.30 वा. वाहतूक सुरळीत, प्रवाशांची गैरसोय
काणकोण : मडगाव-कारवार मार्ग सध्या वाहतुकीच्या दृष्टीने धोकादायक आणि अडचणींचा बनलेला आहे. एका बाजूने या मार्गावरील वाढलेली मालवाहू वाहनांची गर्दी, सुट्टीचा लाभ घेऊन मौजमजा करण्यासाठी या भागात येणाऱ्या पर्यटकांची गर्दी यामुळे अत्यंत वर्दळीचा बनण्याबरोबर हा मार्ग अपघातप्रवण बनलेला आहे. या मार्गावरील बार्से ते गुळेपर्यंतच्या भागात वाहन अपघात घडल्यास संपूर्ण वाहतूक ठप्प होत असते. याचा अनुभव यापूर्वी कित्येक वेळा आलेला असून 6 रोजी त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय येऊन प्रवाशांवर खूपच विपरित परिणाम झाला. संध्याकाळी 6 च्या दरम्यान गुळे येथील श्री भूमिपुरुष देवालयाजवळ दोन मालवाहू वाहनांमध्ये झालेल्या अपघाताने संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. माशे येथील श्री निराकार देवालयाच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी येणारे भाविक जसे यात अडकले त्याचप्रमाणे असंख्य पर्यटक, विद्यार्थी, सरकारी-खासगी कर्मचारी यात अडकून पडले. ही कोंडी रात्री 11.30 च्या दरम्यान सुटली. काणकोणचे पोलीस, अग्निशामक दलाच्या जवानांनी रात्रीच्या वेळी अथक परिश्रम करून ही कोंडी सोडविली असली , तरी ही नित्याचीच गोष्ट बनलेली आहे.
त्यामुळे रस्ता रूंदीकरण, धोकादायक वळणे कापण्याबरोबर बार्से ते गुळेपर्यंतच्या भागात बगलमार्ग तयार करण्याची गरज आता भेडसावायला लागली आहे. बऱ्याच वेळा करमल घाटात अपघात घडल्याची माहिती मिळाल्यानंतर हलकी वाहने आगोंद-खोलमार्गे मडगावला वळवली जातात, तर मडगावहून येणारी वाहने बेतूल, मोरपिर्ला, खोल, आगोंदमार्गे काणकोण तालुक्यात येत असतात. परंतु हा खूपच लांब पल्ला होत असतो आणि अर्ध्यावर पोहोचलेली वाहने परत फिरवून त्या मार्गाने जाणे देखील जिकिरीचे होत असते. त्यामुळे खेडेहून आगोंदमार्गे सोलये रस्त्याची दुऊस्ती आणि ऊंदीकरण करण्याच्या मागणीला आता जोर धरायला लागला आहे. आतापर्यंत करमल घाट किवा अन्य मार्गावर जे अपघात घडले आहेत ते कारवारहून येणाऱ्या वाहनांना अधिक प्रमाणात झालेले आहेत. बेदरकारपणे आणि बऱ्याच वेळा नशेत वाहने हाकली जातात आणि अपघातग्रस्त होतात., असा अनुभव यापूर्वी बऱ्याच वेळा आलेला आहे. काही वेळा रस्त्याची आणि वळणांची कल्पना नसल्यामुळे, तर काही वेळा क्षमतेपेक्षा अधिक माल भरल्यामुळे अपघात घडत असल्याचा निष्कर्ष काढण्यात येत आहे. त्यामुळे या वाहतुकीवर पोलिसांनी नीट नियंत्रण ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे. करमल घाटातील रस्त्याच्या ऊंदीकरणाचा, धोकादायक वळणे कापण्याचा प्रश्न काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांनी हातात घेतला आहे. एवढेच नसून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत ही समस्या पोहोचविलेली आहे. करमल घाटातील रस्त्याचे रूंदीकरण आज ना उद्या होणारच. बेंदुर्डे ते गुळे या रस्त्याच्या रूंदीकरणाच्या दृष्टीने भूसंपादन प्रक्रियेसाठी जवळजवळ 77 कोटी इतका निधी मंजूर झाला असून या प्रक्रियेला येणाऱ्या काही दिवसांत प्रारंभ देखील होणार आहे. त्यापूर्वी या मार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रांची दुरुस्ती करावी आणि रस्ता निर्धोक करावा, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.