प्रतिनिधी : नेरसा-गवळीवाडा येथे झाडाला टांगलेल्या एका प्लॅस्टीक पिशवीत अर्भकाच्या प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. हे अर्भक कोणी सोडले? याबद्दल गेल्या दोन दिवसांपासून गवळीवाडा व खानापूरमध्ये अनेक तर्कवितर्क व्यक्त होत होते. मात्र या अर्भकाला एका अल्पवयीन मुलीने जन्म दिल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, गवळीवाडय़ातीलच एका युवकाचे तेथीलच एका अल्पवयीन मुलीवर प्रेम होते. त्यातूनच त्याने या मुलीशी संबंध जोडले. त्यातूनच या अर्भक जन्माला आले. मात्र दोघेही अल्पवयीन असल्याने घरातील कर्त्या मंडळींनी जबाबदारी नाकारली आणि ती मुलगी प्रसुत झाल्यानंतर हे अर्भक उघडय़ावर ठेवण्यात आले.
नागरिकांनी ही बाब पाहून महिला व बालकल्याण खात्याला तसेच पोलिसांना कळविले. त्यांनी प्लॅस्टीक पिशवीत बाळ सापडल्याचे जाहिर करुन खानापूर येथे
प्राथमिक उपचार करुन बाळाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविले. या बाळाची जबाबदारी आता नेमकी कोण घेणार? हा प्रश्न निर्माण झाला असून बाळाला अनाथ म्हणून जाहिर करु नये आणि बाळ सुरक्षित ज्यांचे आहे. त्यांच्याकडे पोहोचावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते धडपड करत आहेत. या बाबत नेरसा येथील कार्यकर्ते संजय देसाई, रणजीत देसाई, अशोक देसाई, ग्राम पंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष योग्य तो तोडगा निघावा यासाठी प्रयत्न करत आहेत.
अशा अनैतिक संबंधातील मुलांची नोंद आशा कार्यकर्त्यांकडे नसते किंवा आम्हालाहि तशी नोंद करता येत नाहि. घरचे लोक अब्रुसाठी हे दडवून ठेवतात. परंतु बालक जर दगावले असते तर तो खुनाचा गुन्हा दाखल होवू शकतो. बाळ नको असते तर त्यांनी सरळ महिला बालकल्याण खात्याकडे द्यायला हवे. कायदेशीर प्रक्रिया करुन बाळाला आधार केंद्रात पाठविले जाते. आता जिल्हा बाल केंद्राशी चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती खानापूर सीडीपीओ रामामूर्ती यांनी दिली.