किमान वेतनासह सेवेत कायम करण्याची मागणी : प्रशासनाचे मात्र कायम दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
राज्यातील अंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनीस यांना सेवेत कायम करण्यासाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. किमान वेतन आणि सेवेत कायम करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर अनेकवेळा मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. पण याचा कोणताच उपयोग झाला नाही. त्यामुळे अंगणवाडी कार्यकर्त्या संघटनेच्यावतीने गुरुवारी सुवर्णसौध येथे ठिय्या आंदोलन छेडण्यात आले.
महिला आणि बालकल्याण खात्याच्यावतीने विविध योजना राबविल्या जातात. या अंतर्गत देशात 28 लाख आणि राज्यात 1 लाख 30 हजार अंगणवाडी कार्यकर्त्या आणि साहाय्यिका कार्यरत आहेत. सध्या गौरवधन देऊन अंगणवाडी कार्यकर्त्यांकडून काम करून घेण्यात येते. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनेसाठी तसेच जनजागृती करण्याकरिता अंगणवाडी कार्यकर्त्या व साहाय्यिका सतत कार्यरत असतात. तसेच कोरोना काळातही अंगणवाडी कार्यकर्त्या आणि साहाय्यिकांनी सेवा बजाविली आहे. पण अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या मागणीकडे प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले आहे. आजवर राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडे अनेकवेळा निवेदने देऊनही कोणतीच कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे विविध योजना आणि लाभापासून वंचित रहावे लागत आहे.
आपल्या मागण्यांची पूर्तता करण्यात यावी, याकरिता हजारो अंगणवाडी कार्यकर्त्या आणि साहाय्यिकांनी थेट सुवर्णसौध येथे आंदोलन छेडले. अंगणवाडी कार्यकर्त्यांना किमान वेतन देण्यात यावे, त्याचप्रमाणे त्यांचा समावेश ‘क’ श्रेणीत आणि साहाय्यिकांचा समावेश ‘ड’ श्रेणीत करण्यात यावा. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार
ग्रॅच्युटी देण्यात यावी, अंगणवाडीमध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा वेळेत उपलब्ध कराव्यात यासह विविध मागण्यांची पूर्तता करावी, याकरिता आंदोलन छेडण्यात आले होते.