2 ए आरक्षण देण्याची मागणी : सौंदत्ती येथून पदयात्रा काढून सुवर्णसौध येथे धरणे : आरक्षण द्या, अन्यथा ठाण मांडण्याचा इशारा शासनाकडून केवळ आश्वासने
प्रतिनिधी / बेळगाव
लिंगायत पंचमसाली समाजाला 2-ए आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मागील पाच वर्षांपासून करण्यात येत आहे. सातत्याने पाठपुरावा करूनदेखील याची दखल शासनाने केली नाही. त्यामुळे कुडलसंगम पीठाचे बसवजय मृत्युंजय स्वामीजींच्या नेतृत्वाखाली गुरुवारी लाखो नागरिकांच्या उपस्थितीत सुवर्णसौध येथे धरणे आंदोलन छेडण्यात आले. आरक्षण द्या, अन्यथा या ठिकाणीच ठाण मांडू, असा पावित्रा घेण्यात आला.
राज्य शासनाकडे निवेदन देऊन लिंगायत पंचमसाली समाजाचा समावेश 2-ए मध्ये करावा तसेच शासकीय आणि शैक्षणिक सुविधांचा लाभ समाजबांधवांना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र शासनाकडून केवळ आश्वासने मिळत आहेत. आरक्षण द्या, अन्यथा सुवर्णसौधवर मोर्चा काढू, असा इशारा कुडलसंगम पीठाचे स्वामीजी बसवजय मृत्युंजय यांनी दिला होता. तरीदेखील शासनाकडून कोणताच निर्णय घेण्यात आला नाही.
त्यामुळे गुरुवारी सकाळी स्वामीजींच्या नेतृत्वाखाली सौंदत्ती येथून पदयात्रा काढून सुवर्णसौध येथे धरणे आंदोलन छेडण्यात आले. कोंडुसकोप येथे मोर्चासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. मात्र राज्यातील विविध भागांतून लिंगायत पंचमसाली समाजाचे बांधव मोर्चात सहभागी होणार असल्याने आंदोलनाचे स्थळ बदलण्यात आले होते. सुवर्णसौधपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या माळरानावर पंचमसाली समाजाच्या आंदोलनासाठी सुविधा करण्यात आली होती. याठिकाणी राज्यातील विविध भागातील लिंगायत पंचमसाली समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. लाखो नागरिकांच्या उपस्थितीत आरक्षणासाठी धरणे आंदोलन छेडण्यात आले होते.
पदयात्रा दुपारी दाखल झाल्यानंतर या ठिकाणी गर्दी वाढली. तसेच याप्रसंगी बसवजय मृत्युंजय स्वामीजी यांच्यासह विविध नेतेमंडळी आणि मंत्र्यांनी मार्गदर्शन केले. तसेच आरक्षणाची मागणी शासनापर्यंत पोहोचवून आरक्षणासाठी दबाव टाकण्याचे आश्वासनदेखील नेतेमंडळींनी दिले. पण आम्हाला आश्वासन नको, निर्णय हवा, अशी भूमिका घेऊन समाजबांधवांनी सायंकाळी उशिरापर्यंत आंदोलन छेडले.
राज्यातील विविध शहरांतून हजारो वाहनांतून समाजबांधव आंदोलनस्थळी दाखल झाले होते. आंदोलनाच्या परिसरात जिकडे पहाल तिकडे वाहने पार्क करण्यात आली होती. कोंडुसकोप, बस्तवाडपासून आंदोलनस्थळापर्यंत तीन किलो मीटरपर्यंत वाहने पार्क करण्यात आली होती. लाखो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. वाहने पार्क करण्यासाठी विविध ठिकाणी जागा निश्चित करण्यात आली होती. त्यामुळे आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेल्या नागरिकांना वाहने पार्क करून तीन किलोमीटर चालत जावे लागले. त्याचप्रमाणे आंदोलनाच्या ठिकाणी समाजबांधवांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. लाखो नागरिकांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन छेडून सरकारला जागे करण्यात आले. तसेच लिंगायत पंचमसाली समाजाला 2-ए आरक्षण मिळायलाच हवे, असा आग्रह शासनाकडे धरण्यात आला.