राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाच्या कार्यालयात गोजगा, मण्णूर, आंबेवाडी, अगसगेच्या शेतकऱ्यांनी केला विरोध
प्रतिनिधी / बेळगाव
रिंगरोडमुळे शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी नाहीशा होणार आहेत. यामुळे शेतकरी हा भूमीहिन होणार असून त्यांच्यावर मोठे संकट कोसळणार आहे. त्यामुळे रिंगरोडविरोधात आपले म्हणणे मांडताना शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. गुऊवारी गोजगा, आंबेवाडी, मण्णूर, अगसगे येथील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात उपस्थित राहून आम्ही जमीन देणार नाही, असे ठणकावून सांगितले.
शहरापासून दहा किलोमीटरवरून रिंगरोड तयार करण्याचा घाट घालण्यात आला आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांची 1200 हून अधिक एकर जमीन जाणार आहे. ही सर्व जमीन तिबार पिकी आहे. सुपीक जमीन असल्यामुळे तसेच अल्पभूधारक शेतकरी असल्यामुळे मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे बहुसंख्य गावच्या शेतकऱ्यांनी या रिंगरोडला विरोध केला आहे. म. ए. समितीच्यावतीने यापूर्वीच मोर्चा काढून त्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. याचबरोबर रास्ता रोकोदेखील केला आहे.
रस्त्यावरील लढाईबरोबरच आता शेतकऱ्यांना न्यायालयीन लढाई लढावी लागणार आहे. शेतकऱ्यांना ज्या नोटिसा देण्यात आल्या त्या नोटीसीनुसार शेतकरी आपले म्हणणे मांडत आहेत. गुऊवारी मण्णूर, आंबेवाडी, गोजगा, अगसगा येथील 18 हून अधिक शेतकऱ्यांनी आपली हरकत नोंदवली आहे. यावेळी त्यांनी आम्ही कोणत्याही परिस्थितीत जमीन देऊ शकणार नाही, असे स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांच्यावतीने म्हणणे मांडण्यासाठी अॅड. शाम पाटील, अॅड. महेश मोरे आदी उपस्थित होते. याचबरोबर एस. एल. चौगुले यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरीवर्ग उपस्थित होते.