‘आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यांगच आहे. ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र. याकरिता आरमार अवश्यमेव करावे…’ छत्रपती शिवरायांच्या राजनीतीतील आरमार हा एक प्रमुख अध्याय. छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक धुरंधर रामचंद्रपंत अमात्य यांनी रचलेल्या शिवनीतीवरील ‘आज्ञापत्र’ ग्रंथात छत्रपती शिवरायांची आरमाराविषयीची ही रणनीती एका स्वतंत्र अध्यायाद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे. पोर्तुगीज वास्को दी गामाने हिंदुस्थानकडे येणाऱया सागरी मार्गाचा शोध लावला म्हणून हिंदी महासागर आणि अरबी समुद्र हे पोर्तुगालच्या राजाच्या मालकीचे आहेत असे समजत आणि त्यांच्या परवान्याशिवाय हिंदी सत्तांनाही सागरावर संचार करण्यास प्रतिबंध करत त्या काळात शिवाजी महाराजांनी आपले आरमार उभे करून पोर्तुगीजांच्या तथाकथित सागरी अधिकाऱयाला धक्का दिला होता. जे मोगलांना आणि आदिलशहालाही जमले नाही ते एका जहागीरदाराचे पुत्र शिवरायांनी करून दाखवत भारतीय आरमाराचे जनकत्व साडेतीनशे वर्षांपूर्वी स्वतःकडे मिळवले होते. स्वराज्याला खेटून असणाऱया जहागिरीचा मालक सिद्दी विरुद्ध आपण आरमार उभे करत आहोत असे दाखवत पोर्तुगीज तंत्रज्ञांच्या मदतीने शिवरायांनी आपली आरमार उभारणी केली. मात्र समुद्रात उदयास येत असलेल्या या नव्या मराठी सत्तेचा धोका पोर्तुगीज व्हाईसरॉयच्या लक्षात आला आणि त्याने पोर्तुगीज तंत्रज्ञांना पळवून नेले. पण त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या मराठी तंत्रज्ञाच्या साह्याने शिवरायांनी आरमार उभारणी करूनच दाखवली. त्यात इतकी प्रगती केली की, पोर्तुगीजांना शिवरायांची भीती वाटू लागली. एकीकडे सिद्धीला बळ देणारे आदिलशहा आणि मोगल. तर दुसरीकडे पोर्तुगीज, डच आणि इंग्रज अशा जगभरातील महासत्ता भारतीय भूमीत उतरल्या असताना, त्यांना आपल्या आरमारनीतीने शिवरायांनी शह दिला. सिद्दीला जेरीस आणतानाच मुंबईवर ताबा मिळवलेल्या इंग्रजांच्या नाकावर टिच्चून खांदेरीवर कोट उभे करणारे आणि त्याचा प्रतिबंध करण्यास आलेल्या इंग्रजी आरमाराचा पराभव करणारे छत्रपती शिवराय ही भारतीय आरमाराची पूर्वपीठिका! जगाच्या इतिहासात गौरवाने नोंदवली गेलेली भूमिपुत्रांची ही एक आगळी वेगळी यशोगाथा, आज आठवण्याचे कारण आहे पुनर्जन्म घेतलेली आयएनएस विक्रांत! भारतीय नौदलाच्या संरक्षण सिद्धतेतील आत्मनिर्भरतेची अष्टकोनी पताका फडकावत आयएनएस विक्रांत ही पहिली स्वदेशी बनावटीची एखाद्या शहराइतकी भव्यदिव्य विमानवाहू युद्धनौका कोची येथे भारतीय नौदलाच्या सेवेत रुजू झाली आहे. भारताच्यादृष्टीने अत्यंत गौरवास्पद असणारी अशी ही घटना. अशा विमानवाहू नौकांना लक्ष करणारे मिसाईल आम्ही सिद्ध ठेवले आहे अशी दर्पोक्ती चीन करत आहे. यातच भारतीय नौदलाच्या या कामगिरीचे महत्त्व दिसून येते. समुद्रात चाचेगिरी, जमिनीवर लुटालूट, जाळपोळ आणि लोकांना गुलाम करणे हा प्रमुख व्यवसाय असणाऱया धोकेबाज शत्रूंपासून आपला प्रदेश सुरक्षित राखण्यासाठी आरमार हवेच हे ओळखून शिवरायांनी अवश्यमेव असे आरमार धोरण राबवले. आपल्या राज्यात गुलामगिरीची प्रथम नष्ट करणारा आणि गुलामांना अमानुषपणे विक्री करण्यास बंदी घालणारा, भारतीय विचारांची जगाला ओळख करून देणारा हा अष्टावधानी राजा आणि त्याची राजमुद्रा म्हणूनच समुद्रावर भारतीय नौदलाचा ध्वज म्हणून फडकू लागली आहे. याचा मराठी मनाला अभिमान वाटल्या वाचून राहणार नाही. शेजारी राष्ट्रांना कर्ज देऊन त्या कर्जाच्या ओझ्याखाली त्यांना गुलाम बनवण्याचे धोरण आखणारा चीन, एकीकडे पाकिस्तान दुसरीकडे श्रीलंकेला आपल्या कब्जात घेऊन त्यांच्या हतबलतेचा फायदा घेत भारतावर डोळे वटारत आहे. तिन्ही बाजूंनी समुद्राचे कोंदण लाभलेला भारत अडचणीतील राष्ट्रांना सहाय्य करायचे पण, शेजारी म्हणून या आपल्या भारतीय धोरणाने वागतो आहे आणि त्याला आव्हान देणारा चीन सिद्दी, डच, इंग्रज, पोर्तुगीजांप्रमाणेच आजच्या काळात ही साम्राज्यवादी आणि विस्तारवादी रणनीती आखून उभा आहे. अशा काळात एक सुसज्ज नौदल ही भारताची गरज आहे. त्यातही विमानवाहू युद्धनौका स्वदेशातच बनली पाहिजे असे स्वप्न भारताने ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात पाहिले. 1989 साली अशी भारतीय युद्ध नौका बांधण्याचा निर्णय झाला. मात्र आर्थिक स्थितीने हा प्रकल्प पुढे ढकलला गेला. वाजपेयी मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री असणाऱया जॉर्ज फर्नांडिस यांच्या काळात त्याची कार्यवाही सुरू झाली. 2005 साली रशियाने स्टील पुरवठा बंद केला. त्यामुळे दोन वर्षांचा काळ वाया गेला. नंतर भारताने स्वतःच शंभर टक्के पोलाद उत्पादन केले. 2009 मध्ये मनमोहन सिंग काळात काम सुरू झाले. सरकारी कंपन्या डीआरडीओ, स्टील ऑथॉरिटी, बीईएल, भेल, खासगी केल्ट्रॉन, किर्लोस्कर, लार्सन अँड टुब्रो, वार्टसिला, जिंदाल, एसआर, इलेक्ट्रॉलाईट यांनी आपले सर्वोत्तम योगदान दिले. 2013 मध्ये त्याची ट्रायल घेतली. मोदी काळात ती परिपूर्ण झाली. वाजपेयी काळात तीन हजार कोटीचा हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत 20 हजार कोटींवर पोहोचला आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत या संपूर्ण स्वदेशी युद्धनौकेचे लोकार्पण झाले आहे. आणखी एक युध्दनौका तयार करून विक्रमादित्य, विक्रम आणि तिसऱया नौकेचे उद्दिष्ट सफल केले जावे असे अधिकारी सांगत आहेत. देश स्वतंत्र झाल्यानंतर समुद्र मार्गे असणारा धोका लक्षात घेऊन ब्रिटनकडून महायुध्द काळात बनवलेली युध्दनौका विक्रांत घेऊन भारताने अद्वितीय कामगिरी करून दाखवली. ती नौका निवृत्त झाली आणि या संपूर्ण स्वदेशी बनावटीद्वारे तिचा पुनर्जन्म झाला असे मानले जाते. याबरोबरच आणखी एक सिद्धता गरजेची आहे. सीडीएस बिपिन रावत यांनी भारताला पाणबुडय़ांची आवश्यकता असून ती पूर्ण केल्यास अधिकची आणि अत्यावश्यक अशी सिद्धता होईल असे मत नोंदवले होते. दूरदृष्टीने या मागण्यांकडे पहावे लागते. नरेंद्र मोदी हे दिवंगत रावत यांचे ते आवाहन मनावर घेतील. ज्या जोशात त्यांनी या युद्धनौकेच्या अनावरण प्रसंगी संदेश दिला आणि भारतीय नौसैनिकांचे मनोबल उंचावले त्या संदेशाला साजेशी कामगिरी भारताकडून यापुढेही होत राहो याच सदिच्छा!
Trending
- मलकापूर- अणुस्कुरा मार्गावर अज्ञात वाहनाने मोटार सायकलला धडक दिल्याने एक ठार
- मुख्यमंत्र्यांचं कोल्हापूरात ठाण…राज्यात इतरही कामे; आताच कसा वारसा आठवला- सतेज पाटील
- एचडी देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा यांच्यावर हजारो महिलांच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल!
- महिला प्रचारक सांभाळताहेत प्रचाराची धुरा!
- मंडलिक, माने यांना विजयी करा ! राजर्षी शाहू महाराजांचे पणतू राजवर्धन कदमबांडे
- उद्धव ठाकरेंना डावलून संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायंच होतं; शिवसेना प्रवक्ते राजू वाघमारे यांचा गौप्यस्फोट
- भाजपंच पहिल टार्गेट संविधान बदलणं; शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा आरोप
- गांधी मैदानात धडाडणार उद्धव ठाकरे यांची तोफ; महाविकास आघाडीची बुधवार 1 रोजी जाहीर सभा