अध्याय अठ्ठाविसावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, ज्ञानाने अहंकारी झालेले पंडित स्वत:ही गोंधळलेले असतात आणि पंडित्याच्या जोरावर इतरांचीही दिशाभूल करतात. सर्व विश्व ब्रह्माने व्यापलेले असून समोर दिसणारे जग हा केवळ आभास आहे. हा अद्वैत सिद्धांत त्यांना मान्य नसल्याने ते स्वत: ब्रह्माचा अंश आहोत आणि तीच आपली खरी ओळख आहे ही गोष्ट ते विसरतात आणि सध्याच्या जन्मातली त्यांची ओळख ते खरी मानतात. त्यांच्यासाठी विषयोपभोग व त्यातून मिळणारे सुख मुख्य असते. ते आणखीन आणखीन मिळावे ह्यासाठी पुण्यकर्मे करावीत, त्यातून मिळवलेल्या पुण्याच्या आधारे स्वर्गसुखाचा उपभोग घ्यावा असेच त्यांचे मत असते. त्यांचे हे असे मत होण्याला देहाभिमान हेच कारण असते. हा देहाभिमान सज्ञानी लोकांना अधम करून सोडतो.
ह्यामुळे त्यांची काय गती होते ह्याबद्दल गीतेच्या नवव्या अध्यायात मी सांगितले आहेच. ते असे, वेदाभ्यासी सोम-पाने पुनीत । माझ्या यज्ञे इच्छिती स्वर्ग जोडू । ते पुण्याने जाउनी इंद्र-लोकी । तेथींचे ते भोगिती दिव्य भोग । 20 । त्या स्वर्गाते भोगुनी ते विशाळ । क्षीणे पुण्ये मृत्यु-लोकास येती । ऐसे निष्ठा ठेवुनी वेद-धर्मी । येणे-जाणे जोडिती काम-मूढ । 21 । त्यांचा पुण्यसाठा संपल्यावर त्यांना स्वर्गातून पुन्हा मृत्युलोकात यावे लागते. त्यांच्या कर्मामुळे ते जन्ममरणाच्या चक्रात अडकतात. पुन्हा स्वर्ग, पुन्हा नरक, पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जननी जठरे मुक्काम हे असे सतत त्यांचे कित्येक जन्म चालू असते. ह्याप्रमाणे हे पंडित लोक स्वत:च्या ज्ञानाला मूर्खपणाची जोड देऊन अहंकार आणि संसाराची आसक्ती किंवा ओढ ह्याला बळी पडतात पण गंमत म्हणजे त्यांचे ज्ञान वेदाला धरून नसते. त्यामुळे त्यांचे म्हणणे ग्राह्य धरता येत नाही कारण त्यांना वेदात काय सांगितले आहे हे नीट कळलेलेच नसते. त्यांचे म्हणणे म्हणजे त्यांनी मिळवलेल्या ज्ञानामुळे त्यांना झालेल्या अभिमानाचे सोलीव सार होय आणि ते बरोबर आहे असे निर्धारपूर्वक सांगतात.
प्रत्यक्षात ते महामोहाचे आगर असते. त्यांनी सांगितलेल्या विवेकाच्या गोष्टी वृंदावन फळासारख्या असतात. वरवर दिसायला हे फळ अतिसुंदर दिसते पण आतून कारल्यासारखे कडू असते. नामरूपात्मक प्रपंच हा मिथ्या असल्याने मायेने व्याप्त असतो परंतु हे ज्ञानाभिमानी तो खरा मानतात आणि वृथा कचकच वाढवतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रपंचरचनेचे कौशल्य खरे मानावे तर ते देहबुद्धी वाढवते आणि माणसाला दु:ख आणि दारिद्र्याचा अनुभव देते.
खरं म्हणजे वेदाभ्यास करणाऱ्यांची योग्यता थोर असते. ते गायत्रीच्या समान असलेले वेदपठण करतात. सर्व शास्त्रांचा त्यांचा अभ्यास परिपूर्ण असतो. श्रुति, पुराण, इतिहास यात ते तज्ञ असतात. चतुरस्त्र वत्ते असतात. प्रसंगावधानी असल्याने कोणत्यावेळी कसे वागावे, कुठे काय बोलावे हे त्यांना चांगले कळत असते पण हे सर्व नैपुण्य त्यांच्याकडे असल्याने त्यांचा देहाभिमान अतोनात वाढलेला असतो. ते अहंमन्य आणि गर्विष्ठ होतात. मुख म्हणजे अद्वैत ज्ञानावर त्यांचा विश्वास नसतो कारण ही संकल्पनाच त्यांना मान्य नसते. स्वत:च्या योग्यतेमुळे ते अतिआत्मविश्वासी झालेले असतात. त्यामुळे जीव गेला तरी स्वत:च्या मताचा अभिमान सोडायला ते तयार नसतात. अशा ह्या देहाभिमानाने नागवल्या गेलेल्या अहंमन्य पंडितांच्या बोलण्याकडे दीन लोकांनी बिलकुल लक्ष देऊ नये. त्यांच्याकडे बोलण्याकडे लक्ष दिल्यास निश्चित अध:पात होतो. एकप्रकारे ते विषच खात असतात. ज्यांचा विष खाणाऱ्यावर विश्वास बसतो आणि जे त्यांचे म्हणणे खरे मानतात त्यांना त्यांची इच्छा नसतानाही त्यांना अतिवाईट प्रसंग ओढवतात आणि त्यांना मरणाला सामोरे जावे लागते. म्हणून त्यांची संगती कदापि करू नये, त्यांचाशी बोलू सुद्धा नये. त्यांचा सर्वस्वी जीवभावाने त्याग करावा.
क्रमश: