सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी मनपाऐवजी अनगोळ धर्मवीर संभाजी चौकात नागरिकांचे आंदोलन
बेळगाव : शहरासह अनगोळ भागातदेखील पाणी समस्या गंभीर बनली आहे. तसेच वेळेवर पाणीपुरवठा केला जात नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. पाणीपुरवठा व भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी अनगोळ धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन छेडण्यात आले. यावेळी उपस्थित एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. अनगोळ परिसरात 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. मात्र या भागात अलीकडे गंभीर पाणीसमस्या निर्माण झाली आहे. 24 तास पाणीपुरवठा योजना राबवूनही अवेळी पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी अनगोळ परिसरातील रहिवाशांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्याचप्रमाणे टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. अक्षरश: पाण्यासाठी अनगोळ परिसरातील रहिवासी हैराण झाले आहेत. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सातत्याने तक्रार करूनही याची दखल घेण्यात आली नाही. महापालिका प्रशासनाचे नियंत्रण कमी झाल्याने ही समस्या उद्भवत आहे. तसेच अनगोळ परिसरात भटक्मया कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन बालके जखमी झाली होती. भटक्मया कुत्र्यांचे हल्ले सतत सुरूच आहेत.
पाणीपुरवठा सुरळीत करावा आणि भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, या मागणीसाठी अनगोळ परिसरातील रहिवाशांनी महापालिका कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. यानुसार मंगळवारी सकाळी अनगोळ परिसरातील नागरिक धर्मवीर संभाजी चौकात जमा झाले होते. मात्र एलअॅण्डटी कंपनीचे अधिकारी अनगोळ परिसरात येणार असल्याची माहिती महापौर शोभा सोमनाचे यांनी आंदोलनकर्त्यांना दिली. त्याचप्रमाणे याठिकाणी अधिकाऱ्यांकडे समस्यांच्या तक्रारी करण्याची सूचना केली. त्यामुळे आंदोलकांनी अनगोळ येथील धर्मवीर संभाजी चौकात आंदोलन छेडले. या घागर मोर्चाप्रसंगी एलअॅण्डटी कंपनीचे अधिकारी दाखल झाले. पाणीपुरवठा सुरळीत का केला जात नाही, संपूर्ण शहराला 24 तास पाणी देण्यासाठी योजना राबविली जात आहे. पण यापूर्वी 24 तास पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या अनगोळ भागात सुरळीत पाणीपुरवठा करण्याकडे दुर्लक्ष का? असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. रात्री-अपरात्री पाणीपुरवठा केला जात असून, काही ठिकाणी मुबलक पाणी मिळत नाही. त्यामुळे रहिवाशांचे हाल होत असल्याची तक्रार अधिकाऱ्यांकडे केली. काही भागात उच्चदाबाने पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रारही करण्यात आली. यापुढे सुरळीत पाणीपुरवठा करण्यात येईल, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केला. पण पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अधिकाऱ्यांना देण्यात आला. सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्या आश्वासनानंतर नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. तसेच भटक्मया कुत्र्यांच्या बंदोबस्ताबाबत महापालिकेला निवेदन देण्याचा निर्णय देण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर, जे. ए. कावळे, आप्पाजी पुंडेकर, एल. आर. पाटील, एन. पी. पाटील, विशाल पिसे, शोभा किल्लेकर, रत्ना कंबार, पूजा बेळगावकर, सुगंधा देवलकर, कल्पना पवार यांच्यासह परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.