वृत्तसंस्था /मेलबर्न
ऑस्ट्रेलिया भारताविऊद्धच्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी सज्ज होत असताना ओव्हलवरील संघर्षाचा इतिहास बाजूला टाकण्यास उत्सुक असेल. इंग्लंडमधील कसोटी क्रिकेटच्या 140 वर्षांहून अधिक कालावधीत ऑस्ट्रेलियाने सर्वांत खराब कामगिरी ओव्हलवर नोंदविलेली असून 7 ते 11 जून या कालावधीत दोन आघाडीच्या कसोटी संघांमध्ये अंतिम सामना नेमका येथेच होणार आहे.
1880 मध्ये ओव्हलवर इंग्लंडमधील पहिली कसोटी खेळलेल्या ऑस्ट्रेलियाला दक्षिण लंडनच्या या प्रसिद्ध मैदानावर 38 कसोटी सामन्यांत केवळ सात विजय मिळवता आले आहेत. त्या ठिकाणी त्यांचा यशाचे प्रमाण 18.42 टक्के आहे, जे संपूर्ण इंग्लंडमधील कामगिरीचा विचार करता सर्वांत खराब आहे. ऑस्ट्रेलियाने ओव्हलवर गेल्या 50 वर्षांत फक्त दोनदा विजय मिळवलेला आहे. दुसरीकडे, त्यांनी लॉर्ड्सवरील 29 सामन्यांत 17 विजय मिळवले आहेत. येथील त्यांच्या यशाचे प्रमाण 43.59 टक्के असून ते यजमान इंग्लंडच्या 141 सामन्यांतील 39.72 टक्के आणि त्याच ठिकाणच्या दक्षिण आफ्रिकेच्या 33.33 टक्के यशाच्या प्रमाणापेक्षा चांगले आहे. ऑस्ट्रेलियाचे हेडिंग्ले येथील यशाचे प्रमाण 34.62 टक्के, ट्रेंट ब्रिज येथील 30.43 टक्के आणि ओल्ड ट्रॅफर्ड व एजबॅस्टन येथील अनुक्रमे 29.03 टक्के आणि 26.67 टक्के इतके आहे. दुसरीकडे, भारताने देखील या ठिकाणी फार चांगली कामगिरी केलेली नाही. त्यांनी दोन सामने जिंकले आहेत, सात अनिर्णीत ठेवलेले आहेत आणि पाच सामने गमावलेले आहेत. परंतु 2021 मध्ये येथे इंग्लंडवर 157 धावांनी मिळविलेल्या विजयाच्या आठवणी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचा उत्साह वाढवून जातील. 40 वर्षांतील कसोटी सामन्यातील या ठिकाणचा भारताचा तो पहिला विजय होता.
‘क्रिकेट डॉट कॉम ऑस्ट्रेलिया’
नुसार, ऑस्ट्रेलिया संघाचे इंग्लंडमधील पहिले पूर्ण सराव सत्र मध्य लंडनपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या बेकनहॅममध्ये गुरुवारपासून सुरू झालेले असून उर्वरित आठवडाभर पॅट कमिन्स आणि त्याचा संघ केंटच्या मैदानावर सराव करेल. कारण दोन्ही संघांना ओव्हलवरील सुविधा सामन्याच्या दोन दिवस अगोदरपासूनच वापरू दिल्या जाणार आहेत. ओव्हलवरील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल ठरण्याची शक्यता असताना बेकनहॅममधील खेळपट्टी मात्र फलंदाजांसाठी अनुकूल अशी आहे. ऑस्ट्रेलिया 2021-23 जागतिक कसोटी स्पर्धेच्या गुणतालिकेत शीर्षस्थानी असून त्यांचा एकमेव पराभव या वर्षाच्या सुऊवातीला भारताकडून 2-1 असा झाला. मागील आठ वर्षांत त्यांना भारताला मायभूमीत किंवा दूरस्थ लढतींत हरवता आलेले नसून सलग चार मालिकांत त्यांना पराभूत व्हावे लागलेले आहे.