वृत्तसंस्था/ दुबई
भारताविरुद्ध होणारी बॉर्डर-गावसकर करंडक कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाला जिंकण्याची चांगली संधी असून ते 2-1 फरकाने ही मालिका जिंकतील, असे मत लंकेचा माजी महान फलंदाज महेला जयर्वर्धनेने व्यक्त केले. गुरुवारपासून यातील पहिली कसोटी नागपूरमध्ये सुरू होत आहे.
ऑस्ट्रेलिया व भारत आयसीसी संघांच्या मानांकनात आणि आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्येही पहिल्या व दुसऱया स्थानावर आहेत. भारताने 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेली मालिका जिंकली असल्याने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी सध्या भारताकडेच आहे. ऑस्ट्रेलियाला 2004 नंतर भारतात एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. ही मालिका खंडित करण्याची क्षमता पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलिया संघात असल्याचे जयवर्धनेला वाटते.
‘या दोन संघांतील मालिका नेहमीची चुरशीची व रंगतदार होते. भारतीय वातावरण ऑस्ट्रेलियन फलंदाज कसे हाताळतात तसेच ऑस्ट्रेलियाकडे चांगले गोलंदाज असून त्यांना भारतीय फलंदाज कसे सामोरे जातात हे पाहणे मनोरंजक ठरेल आणि त्यावरच मालिकेची भवितव्यही अवलंबून असेल. मालिकेची चांगली सुरुवात करणारा संघ वरचढ ठरण्याची अपेक्षा आहे. मात्र ही मालिका निश्चितच चुरशीची होईल, असे मला वाटते,’ असेही तो म्हणाला. मालिकेचे भाकीत करणे कठीण असले तरी ऑस्ट्रेलियाला जास्त संधी आहे, असे मला वाटते, कदाचित ते 2-1 अशा फरकाने मालिका जिंकतील. मात्र ही मालिका त्यांच्यासाठी कठीण जाईल, एवढे निश्चित, असा अंदाजही त्याने व्यक्त केला.
शुबमन गिलच्या जबरदस्त फॉर्ममुळे भारताला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना समर्थपणे सामोरे जाण्याचे बळ मिळाले आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याने जबरदस्त खेळ केला आहे. हाच फॉर्म तो कसोटीतही कायम राखत आपला ठसा उमटवेल, असा विश्वास जयवर्धनेने व्यक्त केला. या मालिकेतील चौथी व शेवटची कसोटी 9 मार्चपासून सुरू होणार आहे.