पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि लष्कर प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांनी नुकताच दुबईत अंतिम श्वास घेतला. आपल्या आततायी कृतीने पाकिस्तानला अंधारात लोटणारे आणि भारत-पाकिस्तान या दोन राष्ट्रांमध्ये निर्माण होणाऱया मैत्रीच्या संबंधाला उध्वस्त करणारे कारगिलचे खलनायक म्हणून इतिहास त्यांची कायमच नोंद घेणार आहे. फाशीची शिक्षा झालेला गुन्हेगार म्हणून परदेशात आश्रय घ्यावा लागलेल्या या लष्करशहाबद्दल त्यांच्या देशातही मूठभर लोक सोडले तर कोणी चांगले म्हणणारे नाहीत. 1999 साली तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि नवाज शरीफ यांनी भारत आणि पाकिस्तानातील कटुता नष्ट करण्यासाठी केलेल्या लाहोर शांती प्रयत्नांना पाकिस्तानी लष्कर प्रमुख म्हणून त्यांनी खोडा घातला. कारगिलमध्ये भारतीय हद्दीत घुसखोरी केली. शेकडो भारतीय सैनिकांनी हौतात्म्य पत्करुन ही घुसखोरी उद्ध्वस्त केली. याच काळात पाकिस्तानात सत्तांतर घडवून कारगिलमध्ये सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेणाऱया नवाझ शरीफ यांना पदच्युत करून लष्करी राजवट लागू करणारे आणि त्यानंतर स्वतःला राष्ट्रप्रमुख घोषित करणारे हे मुशर्रफ. कारगिलमध्ये केलेली घुसखोरी ही पाकिस्तानी लष्कराने नव्हे तर काश्मीर स्वतंत्र करू इच्छिणाऱया अतिरेकी गटाने केली आहे असा भासवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र बीजिंग येथे बसून भारतावरील हल्ल्याची पाकिस्तानी लष्करातील प्रमुख व्यक्तीकडून माहिती घेत असतानाचे त्यांचे फोन संभाषण भारतीय लष्करी गुप्तचर यंत्रणेने ध्वनिमुद्रित केले आणि ते यथावकाश नवाज शरीफ यांनाही ऐकवून एका भरगच्च पत्रकार परिषदेत जगाला ऐकवले. तेव्हा त्यांचा नापाक मनसुबा उघड झाला. तरीही त्यांची नांगी पुरती ठेचली गेली नाही. 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेवर तालिबान्यांनी केलेल्या हवाई हल्ल्यानंतर अमेरिकेच्या परिस्थितीचा गैरफायदा उचलत अफगाण अतिरेक्मयांविरोधात लढण्याचे कॉलीन पॉवेल यांच्या दबावानंतर त्यांनी नाटक केले. जॉर्ज बुश यांना गंडवून आंतरराष्ट्रीय समुदायाचा पैसा आणि शस्त्रे यथेच्च वापरून पाकिस्तानला अतिरेक्मयांचा अड्डा बनवले. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या फसवणुकीचा खेळ त्यांनी प्रदीर्घ काळ खेळला. स्वतःला राष्ट्रपती म्हणून मान्यताही घेतली. कारगिलचे कृत्य विसरुन भारताने त्यांच्याशी चर्चा चालवली. या काळात चूक सुधारुन भारताशी संबंध सुधारण्याची संधी असताना आपल्या हेकेखोरपणाने आग्रा समझोता बैठक सोडून जाणारे उद्दाम मुशर्रफ जगाने पाहिले. विरोधी नेत्यांच्या हत्या घडवून देशावर पकड मजबूत करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. 2007 मध्ये निवडणुकीच्या दरम्यान बेनझीर भुट्टो यांची झालेली हत्या मुशर्रफ यांच्या काळय़ा पर्वाची साक्ष देणारीच आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी श्रद्धांजली वाहताना मुशर्रफना यांना क्षमा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करणार असल्याचे म्हटले आहे. माजी पंतप्रधान युसूफ रजा गिलानी यांचे पुत्र मुसा यांनी, मुशर्रफ गेले मात्र लोकशाही जिवंत आहे! आपल्या वडिलांच्या आयुष्यातील पाच वर्षांसह माझ्यासहित अनेक पाकिस्तानी मुलांचा बालपणीचा काळ हिरावून घेतला अशा शब्दात त्यांना निरोप दिला आहे. खरे तर मरणानंतर वैर संपते असे मानवी संस्कृती सांगते. पण, हे तत्व काहींना लागू पडत नाही. त्यांच्या कारनाम्याचा प्रभाव त्या त्या काळावर पडतो आणि त्याचे परिणाम पुढच्या अनेक पिढय़ांना भोगावे लागतात. म्हणूनच तेवढा काळ ते लोकांच्या शापाचेच धनी बनतात. पाकिस्तानी वाणिज्य मंत्रालयाने त्यांच्या कुटुंबीयांच्या विनंतीवर सहानुभूतीपूर्वक विचार करून मृतदेहावर पाकिस्तानात अंत्यसंस्काराची परवानगी दिली आहे. मात्र पाकिस्तानवर राज्य करण्यासाठी न्यायाधीशांना तुरुंगात टाकून आणीबाणी घोषित करणाऱया आणि नंतर निवडणुकीत उतरणाऱया मुशर्रफ यांना जनतेने नाकारले. फाशीचा गुन्हेगार ठरवले. त्या शिक्षेपासून वाचण्यासाठी त्यांना परदेशात आसरा घ्यावा लागला आणि तिकडेच त्यांचा अंत झाला. नियतीने घेतलेला हा सूडच म्हटला पाहिजे. 1965 आणि 1971 च्या भारत युद्धात पराभूत होऊनही मुशर्रफ यांना खुमखुमी होतीच. 1998 मध्ये नवाज शरीफ यांनी त्यांना लष्कर प्रमुख केले. पण त्यांनी नवाज यांनाच पदच्युत केले. राहत्या घरात नजरकैद केले. पाकिस्तानची घटना बरखास्त करून आणीबाणी जाहीर केली. पंतप्रधान शौकत अझीज यांच्यासोबत मध्यमवर्गाला बळकटी देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे दाखवत त्यानी जीडीपी वाढता ठेवला. पण प्रत्यक्षात जनतेच्या हाती पैसा येत नसल्याने राष्ट्रीय बचत कमी झाली आणि देशात कमालीची विषमता वाढली. त्यातून सावरायला पाकिस्तानला आणि मुशर्रफ यांनाही संधी मिळाली नाही. नऊ वर्षांची काळी कारकीर्द 2008 मध्ये महाभियोगाच्या सावटाखाली संपली आणि लंडनला पळ काढावा लागला. 2013 साली त्यांनी पाकिस्तानात येऊन पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न केला. पण, कोर्टाने त्यांचे मनसुबे उधळले. भुट्टो, बुगटी आदींच्या हत्येच्या खटल्यांनी डोके वर काढले. नवाज शरीफ पुन्हा सत्तेवर येताच त्यांनी गद्दारीचा खटला चालवला. त्यामुळे ते दुबईला पळाले. दरम्यान त्यांना फाशी झाली. ती रद्द ही झाली. पण नियतीने त्यांना पुन्हा पाकिस्तानात येऊ दिले नाही. पण मुशर्रफ यांच्यामुळे पाश्चिमात्य राष्ट्रांचा पाकिस्तानावरील विश्वास कायमचा संपला. मुशर्रफ यांच्या धोरणामुळेच तहरीक ए तालिबान पाकिस्तान सारखी विषवल्ली पाकिस्तानात पसरली आणि त्यांनी पाकिस्तानी सैन्य मुख्यालयासह नागरी वस्त्यांवरही हल्ले केले. भारताविषयी द्वेष, स्वतःःविषयी अती आत्मविश्वास मुशर्रफ यांच्या नाशास कारणीभूत ठरला. कारगील युद्धाच्या दोन तपानंतर पाकिस्तान आज आपल्याच गुंत्यात गुंडाळून पडला आहे. उर्वरित जग आपल्या गतीने धावत आहे.
Previous Articleऑस्ट्रेलियाला मालिका जिंकण्याची संधी ः जयवर्धने
Next Article कमी वयात मोठी कमाल
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.