सर्वोच्च न्यायालयाने दाखविली नरमाई
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पतंजलिच्या कथित भ्रामक जाहिरातीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली आहे. याप्रकरणी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण हे मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहिले. पतंजलिने वृत्तपत्रांने प्रकाशित केलेला माफीनामा रजिस्ट्रीत जमा करण्यात आला असे योगगुरु बाबा रामदेव यांच्या वतीने वकील मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. तसेच त्यांनी वृत्तपत्रात प्रकाशित माफीनामा न्यायालयात दाखविला आहे. हा माफीनामा पाहिल्यावर सर्वोच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांच्यासंबंधी नरमाईची भूमिका घेतली आहे.
रोहतगी यांनी वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित माफीनाम्याची माहिती दिल्यावर सर्वोच्च न्यायालयाने मूळ नोंदी का दिल्या नाहीत, ई फायलिंग का केले अशी विचारणा केली. यावर रामदेव यांचे अन्य वकील बलवीर सिंह यांनी आमच्या अज्ञानामुळे असे घडले असावे असे स्पष्टीकरण दिले. मागील वेळा जो माफीनामा प्रकाशित करण्यात आला होता, तो छोटा होता आणि त्यात केवळ पतंजलि असे नमूद होते. तर दुसरा माफीनामा मोठा आहे. याकरता आम्ही रामदेव यांना जाणीव झाल्याची प्रशंसा करतो असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
सुनावणीदरम्यान रोहतगी यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रमुखाच्या वक्तव्याचा उल्लेख केला. यात त्यांनी पतंजलिसोबत सर्वोच्च न्यायालयावर टीका केली होती. आयएमए प्रमुखाने नेमके काय म्हटले होते हे रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. यावर सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेत आयएमए अध्यक्षांचे वक्तव्य रिकॉर्डवर आणले जावे, हे अत्यंत गंभीर प्रकरण असून याचा परिणाम भोगण्यासाठी त्यांनी तयार रहावे असे म्हटले आहे.
बाबा रामदेव आणि बालकृष्ण यांना सुनावणीस अनुपस्थित राहण्याची मुभा देण्यात यावी अशी विनंती वकील रोहतगी यांनी केली होती. ही विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. परंतु ही मुभा केवळ पुढील सुनावणीपुरती मर्यादित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.