‘पश्चिम बंगाल राज्य आज तृणमूल काँग्रेसच्या राज्यात माफिया आणि गुंडांचे आश्रयस्थान बनले आहे. केंद्रात पुन्हा भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यास सर्व माफिया, गुन्हेगार, दहशतवादी आणि गुंडांची संपत्ती जप्त केली जाईल आणि तिचे गरीबांमध्ये वाटप केले जाईल,“ असे विशेष आश्वासन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहे. सर्वांच्या संपत्तीचे सर्वेक्षण केले जाईल आणि संपत्तीचे पुनर्वाटप केले जाईल, अशा अर्थाच्या काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनाला प्रत्युत्तर म्हणून भारतीय जनता पक्षाने माफियांवर कारवाईचा निर्धार व्यक्त केला.
उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील माफियांविरोधात कठोर करवाई केल्याने त्यांच्यापैकी अनेकांचा नाश झाला आहे. अन्य अनेकांनी उत्तर प्रदेशातून पळ काढून पश्चिम बंगालमध्ये आश्रय घेतला आहे. कारण येथील तृणमूल काँग्रेसचे सरकार त्यांना अनुकूल आहे. पश्चिम बंगाल आज माफियांचा स्वर्ग बनले आहे. पण आम्ही त्यांना येथेही सोडणार नाही. त्यांना पकडले जाईल आणि त्यांनी बेकायदेशीर मार्गाने कमावलेली प्रचंड संपत्ती जप्त केली जाईल. या संपत्तीवर गरीबांचाच अधिकार आहे. कारण त्यांना लुटूनच या माफियांनी ती कमावली आहे, असा घणाघात करताना योगी आदित्यनाथ यांनी तृणमूल काँग्रेसला धारेवर धरले.
एकेकाळी होते सरकारवर नियंत्रण
2017 मध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार उत्तर प्रदेशात आले. त्यापूर्वी तेथील माफियांचे प्रत्यक्ष राज्यसरकारवरच नियंत्रण होते. पण सत्तापरिवर्तन झाल्यानंतर माफियांविरोधात कठोर पावले उचलण्यात आली. त्यामुळे आता ते जीवाची भीक मागत आहेत. त्यांनी सुरक्षित स्थळे शोधण्यास प्रारंभ केला असून पश्चिम बंगाल हे राज्य त्यांना सुरक्षित वाटत आहे. कारण येथील राज्यसरकार त्यांना विरोध करण्यास धजावत नाही. आम्ही ही परिस्थिती बदलू, असे आश्वासन त्यांनी दिले.
लोकसंख्या बदलण्याचा प्रयत्न
पश्चिम बंगालचे सरकार बीरभूमसारख्या लोकसभा मतदारसंघात हिंदूंची संख्या कमी करुन विशिष्ट धर्मियांची संख्या वाढविण्याच्या प्रयत्न करीत आहे. स्वत:च्या राजकीय स्वार्थासमोर त्यांना देशहिताचीही चिंता वाटत नाही. या मतदारसंघातील तीन विधानसभा क्षेत्रांमध्ये आज अल्पसंख्याक अधिक झाले आहेत. केवळ चार विधानसभा क्षेत्रेच हिंदुबहुल राहिली आहेत. असे करुन तृणमूल पश्चिम बंगालला विनाशाकडे नेत आहे. लोकांनी त्यामुळे सावधपणे मतदान करुन हे कारस्थान हाणून पाडावे, असे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभेत केले.