कृषी, पणन गट विभाजनानंतर राजकीय वर्तुळात रंगली चर्चा : जिल्हा बँकेत सत्ताधाऱ्यांचा विरोधकांना रोखण्याचा प्रयत्न : पोटनियम दुरुस्तीतून केली सोय
धीरज बरगे/कोल्हापूर
जिल्हा बँकेच्या शुक्रवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कृषी, पणन संस्था आणि शेतीमाल प्रक्रीया संस्था गटाचे विभाजन करत खासदार संजय मंडलिक व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांना शह देण्याची खेळी सत्ताधाऱयांनी खेळली. जिल्हा बँकेच्या राजकीय पटलावर आत्ता जरी ही चाल रचण्यात आली असली तरी यामधून विरोधकांना रोखण्याचा प्रयत्न सत्ताधाऱयांचा आहे. पोटनियम दूरुस्तीतून नवीन चार जागांमध्येही साखर कारखाना गटाला एक आणि दूध संस्थांना दोन जागा देत आपलेच वर्चस्व कायम राखण्याची सोय सत्ताधाऱयांनी केली आहे.
सहकाराच्या राजकारणामध्ये नेते पक्षीय राजकारण बाजूला ठेवत सोयीची भुमिका घेतात. जिल्हा बँकेतही हिच परिस्थिती आहे. बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधत बँकेची निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांना सोबत घेण्यास आमदार विनय कोरे यांनी विरोध केला. त्यानुसार आमदार मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्याच आसुर्लेकर यांना डावलले. तर खासदार संजय मंडलिक यांनी आसुर्लेकर यांचा पॅनेलमध्ये समावेश करण्याचा आग्रह धरला. अन्यथा निवडणुक लढण्याचा इशारा दिला.
सत्ताधाऱ्यांनी खासदार मंडलिक यांचा आसुर्लेकर यांना संधी व शिवसेनेसाठी मागितलेल्या जागा या दोन्ही मागण्या मान्य केल्या नाहीत. त्यामुळे नाराज झालेल्या मंडलिक यांनी स्वतंत्र पॅनेल करत निवडणुक लढवली. निवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील हे कोल्हापुरचे अदानी-अंबानी असल्याची टिका खासदार मंडलिक यांनी केली होती. मंडलिक व आसुर्लेकर यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या असणाऱया या निवडणुकीत त्यांनी कृषी, पणन शेतीमाल प्रक्रीया गटातून सत्ताधाऱयांना धुळ चारत बाजी मारली. तर मंडलिक यांच्याच पॅनेलमधून अर्जुन आबिटकर हे देखिल विजयी झाले. विरोधकांचा हा विजयच सत्ताधाऱयांच्या पचनी न पडल्याने खासदार मंडलिक व बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांची जिल्हा बँकेत जमलेली गट्टी फोडण्यासाठीच सत्ताधाऱयांनी त्यांच्या मतदार संघाची विभागणी केल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
दोघांपैकी एकालाच संधी
कृषी पणन, प्रक्रीया गटातून खासदार मंडलिक आणि आसुर्लेकर निवडून आले होते. मात्र पोटनियम दुरुस्तीमधून त्यांच्या गटाची विभागणी करत यामधील एक जागा साखर कारखाना गटाला दिली. कारखाना गटात सत्ताधाऱयांचे वर्चस्व राहणार आहे. तर प्रक्रीया गटातील आसुर्लेकर यांचे वर्चस्व ओळखून या गटाचे विभाजन करत या गटातून एकच जागा आसुर्लेकर यांना मिळेल याची बेजमी केली आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीत या गटातून दोघांपैकी एकालाच संधी मिळेल.
स्वतःची सोय पाहून संचालक वाढीचे गट
नवीन चार जागांसाठीचे गटही स्वतःच्या वर्चस्वाची सोय पाहून केले आहेत. यामध्ये साखर कारखाना गटातील आपले वर्चस्व पाहता या गटासाठी एक तर गोकुळमधील सत्तेचा वापर आणि विनय कोरे यांच्या माध्यमातून वारणा दूध संघाची मिळणारी ताकद पाहता दूध संस्था गटासाठी दोन जागा दिल्या आहेत. इतर संस्था गटातही सत्ताधाऱयांचेच वर्चस्व आहे. वाढीव संचालक गटातही स्वतःच्या वर्चस्वाची सोय पाहूनच गट केल्याचा आरोप विरोधकांमधून होत आहे.
आबिटकरांनाही रेखण्याचा प्रयत्न
संचालक अर्जून आबिटकर निवडून आलेल्या नागरी सह. बँक, पतसंस्था गटाचेही विभाजन करुन आबिटकरांनाही रोखण्याचा प्रयत्न सत्ताधाऱयांचा होता. मात्र या गटातील विभाजन आबिटकरांसाठीच फायदेशीर ठरणार हे लक्षात आल्यानंतर सत्ताधाऱयांनी यागटाची विभागणी न करता तो आहे तसा कायम ठेवला.