जळगाव / प्रतिनिधी :
उद्धव ठाकरे यांच्याकडे भविष्यात काहीच राहणार नाही. पक्ष, पक्षाचे नाव व चिन्हदेखील गेले. सर्व काही हातातून जात असल्याने त्यांचा तोल जाऊ लागला असून, त्यांच्यासाठी पुढचा काळ अतिशय बिकट असेल, असे भाकीत राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी येथे मंगळवारी येथे वर्तविले.
महाजन म्हणाले, भाजपासोबत निवडणूक लढवून जनतेने भाजप व शिवसेनेला स्पष्ट बहुमत दिल्यानंतरदेखील ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली. भाजपशी युती तोडणे, ही ठाकरे यांच्या आयुष्यातील सर्वांत मोठी चूक होती. त्यामुळे आगामी काळात त्यांना पश्चाताप करायलाही वेळ मिळणार नाही. त्यांच्यासाठी आगामी काळ हा खूप बिकट असेल. हळूहळू आपल्याला सगळे काही बघायला मिळेल.
अधिक वाचा : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचा उद्धव ठाकरेंना पाठींबा
शिवसेना आता जनताभिमुख झाली आहे. आता ठाकरे काहीही बोलतील. पण, त्यांनी युती तोडली तेव्हाच त्यांनी निवडणूक घेऊन जनतेसमोर जायला हवे होते. आता चिन्ह हातातून गेल्यावर निवडणुका घेण्याच्या घोषणा करण्यात काहीही अर्थ नाही, असे सुनावतानाच ठाकरे स्वत:ला एकीकडे शिवसेनेचे मालक म्हणवत होते. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने खरी शिवसेना बाहेर आली असल्याचे महाजन यांनी सांगितले.