जागोजागी खड्डे पडल्याने गैरसोय : वाहतूक धोकादायक, कामाला चालना देण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बेकिनकेरे-गोजगा या तीन किलो मीटरच्या संपर्क रस्त्याकडे दुर्लक्ष झाल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालविणे धोकादायक बनले आहे. याबाबत कित्येकवेळा तक्रारी देऊनदेखील सार्वजनिक बांधकाम खाते आणि लोकप्रतिनिधी सुस्त असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रस्त्यासाठी रास्ता रोको करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.
या मार्गावरून कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातील वाहनांची वर्दळ असते. शिवाय दोन्ही राज्यांना जोडणारा हा महत्त्वाचा संपर्क रस्ता आहे. मात्र मागील दहा वर्षांपासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने वाहनधारकांना ये-जा करणे त्रासदायक बनले आहे. विशेषत: पावसाळ्यात रस्त्यावर पावसाचे पाणी साचून चिखलाचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्यामुळे काही दिवस रस्त्याच वाहतुकीसाठी ठप्प होत आहे.त्यामुळे रस्त्याची उंची आणि रुंदी वाढवून रस्ता करावा, अशी मागणी वाहनधारकांतून जोर धरून आहे.
जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी
केवळ निवडणूक आली की लोकप्रतिनिधींकडून आश्वासनाचा पाऊस पडतो. मात्र त्यानंतर अंमलबजावणीकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे जनतेला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. या रस्त्यासाठी कित्येकवेळा तक्रारी करूनदेखील लोकप्रतिनिधींनी जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
झाडा-झुडपांनी झाकला रस्ता
या रस्त्यावरून चंदगड तालुक्यातील कोवाड, नेसरी, आजरा, गडहिंग्लज भागातील वाहनधारकांची वर्दळ असते. शिवाय मार्ग शिवारातून गेल्याने शेतकऱ्यांची देखील ये-जा असते. मात्र रस्त्याची संपूर्ण चाळण झाल्याने रस्ता जीवघेणा बनला आहे. दरम्यान शिवारातील माल बाहेर आणणे देखील कठीण झाले आहे. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडे-झुडपे वाढून रस्ता झाकला गेला आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारात अपघातांना आमंत्रण मिळत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी आल्याने रस्ता उखडून गेला आहे. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करतच वाहने चालविण्याची वेळ आली आहे. तरी रस्त्याच्या कामाला तात्काळ सुरुवात करावी, अन्यथा आंदोलन छेडू, अशा इशारा नागरिकांनी दिला आहे.