मत्स्य खात्याची विशेष योजना, व्यवसायाला चालना, उत्पादनात वाढ होण्याची शक्यता : नापीक ठिकाणीच शेततळ्यांची निर्मिती
प्रतिनिधी /बेळगाव
नापीक जमिनीत शेततळ्यांची निर्मिती करून उत्पन्न मिळविण्यासाठी मत्स्य विभागाने विशेष योजना राबविली आहे. त्यामुळे नापीक जमिनीतून देखील आता शेतकऱ्यांना उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होणार आहे. ज्या ठिकाणी नापीक जमीन आहे. त्या ठिकाणी शेततळ्यांची निर्मिती करून मत्स्यपालनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
अलीकडे शेतीला जोड व्यवसाय म्हणून पशुपालन, कुक्कुटपालन आणि मत्स्यपालनाकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मत्स्य खात्याच्या योजनेचा लाभ घेवून मत्स्यपालनासाठी पुढे यावे, असे आवाहन मत्स्य खात्याने केले आहे. जिल्ह्यातील 485 ग्रामपंचायत अखत्यारितीतील 184 तलावांमध्ये मत्स्यपालनाला चालना देण्यात येणार आहे. शिवाय यासाठी 4000 हजार मत्स्यबीज मोफत पुरविली जाणार आहेत. त्यामुळे ग्रा. पंचायतींना देखील अधिक उत्पन्न मिळणार आहे.
जिल्ह्यात पडीक जमिनीचे क्षेत्र देखील अधिक आहे. शिवाय पाण्याविना पडून असलेल्या जमिनीचे क्षेत्रदेखील आहे. यामध्ये शेततळ्यांची निर्मिती करून मत्स्यपालनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे. त्यामुळे अशा जमिनीतून उत्पन्न मिळण्यास मदत होणार आहे. पडीक जमिनीतून कोणतेही उत्पन्न मिळत नाही. शिवाय वर्षानूवर्षे अशी जमीन पडूनच आहे. या जमिनीत शेततळ्यांची निर्मिती झाल्यास पावसाळ्यात मुबलक पाण्याचा साठा होईल आणि त्यानंतर मत्स्यबीज सोडून माशांचे उत्पादन घेतले जाणार आहे.
संबंधित शेतकऱ्यांनी पुढे येणे गरजेचे
अलीकडे रोजगार हमी योजनेतून शेततळ्यांची निर्मिती केली जात आहे. अशा तळ्यातून माशांची पिल्ले सोडून मत्स्य उत्पादन केले जाणार आहे. यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी पुढे येणे आवश्यक आहे. जिल्ह्यात 1.50 लाख हेक्टर पडीक जमीन आहे. यामध्ये विशेषत: मत्स्यपालन योजना राबविली जाणार आहे. कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा नदीकाठावरील 64 हजार हेक्टर क्षेत्र नापीक बनले आहे. याठिकाणी तलावांची निर्मिती करून मत्स्यपालन उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
रोजगार हमीतून तलावांची निर्मिती
अतिवृष्टी, रासायनिक खतांचा वाढता वापर आणि इतर कारणांमुळे नापीक जमिनीचे क्षेत्र वाढले आहे. अशा शेतीमध्ये मत्स्य शेती करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. येत्या काळात या नापीक जमिनीत रोजगार हमीतून तलावांची निर्मिती करून मत्स्यपालन केले जाणार आहे.
नदीकाठी 64 हजार हेक्टर क्षेत्र नापीक
केंद्रसरकारच्या पीएमएमएसवाय या योजनेंतर्गत मत्स्यपालनासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. या अंतर्गत नापीक जमिनीत देखील शेततळ्यांची निर्मिती करून मत्स्यपालन करता येते. नदीकाठी 64 हजार हेक्टर क्षेत्र नापीक बनले आहे. अशा ठिकाणी मत्सपालनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.
– सुधाकर पी. (सहसंचालक मत्स्य खाते)