दुरुस्ती कामाला वेग, तलावाचा कायापालट, ग्रामस्थांतून समाधान
बेळगाव : बेकिनकेरे येथील दुर्दशा झालेल्या तलावाच्या दुरुस्तीचे काम रोजगार हमी योजनेतून केले जात आहे. तलावाच्या दुरुस्तीसाठी रोजगार हमीचा आधार मिळाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. तलावाच्या संरक्षण भिंतीबरोबर तलावाला भराव घालण्याचे काम रोजगार महिला करू लागल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळी हंगामात पाण्याचा समाधानकारक साठा होईल, अशी माहिती ग्रामपंचायत सदस्या गंगुबाई गावडे व लक्ष्मी सोमनाथ सावंत यांनी दिली आहे. बेकिनकेरे-अगसगा मार्गावर तलाव आहे. मात्र मागील दोन वर्षात अति पावसाने तलाव भरून बाजूचा भराव खचला होता. दरम्यान तलाव फुटून रस्ता बंद होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र रोजगार हमी योजनेतून तलावाला संरक्षण भिंत बांधण्याबरोबर तलावाच्या सभोवती मातीचा भराव टाकण्यात आला. त्याचबरोबर तलावासभोवती तारेचे कुंपण घालून संरक्षण केले जाणार आहे. त्यामुळे गावच्या आणि तलावाच्या सौंदर्यातदेखील भर पडणार आहे. बेकिनकेरे गावात पाणीसमस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे गावकऱ्यांबरोबर जनावरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. सार्वजनिक तलावाची पाणीपातळी घटली आहे. दरम्यान, तलावात असलेल्या पाण्यावर जनावरांची तहान भागवली जात आहे. मात्र दूषित झालेल्या तलावातील पाण्याचा उपसा करून गाळ काढावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होऊ लागली आहे. पाऊस लांबणीवर पडल्याने तलावातील पाण्याचा साठा कमी झाला आहे. त्यामुळे शिल्लक असलेल्या दूषित पाण्याचा उपसा करून गाळ काढण्याची संधी आहे. ग्राम पंचायतीने याकडे जातीने लक्ष देऊन तलावातील दूषित पाण्याचा उपसा करावा, अशी मागणी होत आहे.
पाण्याचा गावकऱ्यांना उपयोग
रोजगार हमी योजनेतून तलावाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे तलावाचा कायापालट झाला आहे. तलावाच्या संरक्षण भिंतीबरोबर मातीचा भराव टाकला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा योग्य साठा होईल आणि गावकऱ्यांना या पाण्याचा वापर होईल.
– गंगुबाई गावडे (ग्रा. पं. सदस्या)