गतिरोधक घालण्याची प्रवाशांची मागणी : वेगावर नियंत्रण आणण्याचीही गरज
र्वाताहर / उचगाव
उचगावनजीकचा बेळगुंदी फाटा हा सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे साफ दुर्लक्ष केल्याने या फाट्यावर अजून किती जणांचे बळी हवेत अशा संतप्त प्रतिक्रिया या भागातील नागरिक व प्रवासी वर्गातून करण्यात येत आहेत. अपघात रोखण्यासाठी तातडीने या फाट्यावर गतिरोधक घालावेत आणि वेगवान वाहनावर निर्बंध घालावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बेळगाव वेंगुर्ले हा मार्ग कर्नाटक, महाराष्ट्र अशा दोन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा महामार्ग आहे. या मार्गे गोव्याला जाणाऱ्या वाहनांचीही वर्दळ सातत्याने असते. बेळगुंदी, राकसकोप या भागातील बहुतांश नागरिकही याच रस्त्याने येतात. अपघाती वळण असल्याने या फाट्यावरच सातत्याने अपघात होण्याची मालिकाच सुरू झाली आहे. यासाठी या ठिकाणी गतिरोधकची नितांत गरज आहे. मात्र याकडे संबंधित खाते कानाडोळा करत असल्याच्या तक्रारी नागरिकांतून करण्यात येत आहेत. या बरोबरच बेनकनहळी परिसरात शासनाची धान्याची गोडावून असल्याने त्याची वाहतूकही याच मार्गे सुरू असते.साहजिकच या फाट्यानजीक सतत रहदारी व वाहनांची वर्दळ असते. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे.
हेस्कॉमचे मोठे नुकसान
बेळगुंदी फाट्यावर बेळगुंदी रोडच्या दिशेने येणारे भरधाव ट्रक आत्तापर्यंत चारवेळा समोरील एका फार्म हाउसमध्ये शिरून हेस्कॉमचे फार मोठे नुकसान झाले आहे. बॉक्साईडने भरलेले वेगवान ट्रक रात्रीच्यावेळी फार्म हाऊसच्या रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबावर आदळल्याने विद्युतखांब कोसळून मोठे नुकसान झाले आहे. फार्महाऊस मालकांचेही मोठे नुकसान झाले आहे. गेल्या दोन महिन्यात चारवेळा बॉक्साईटचे ट्रक आत घुसून हेस्कॉमचे नुकसान केले आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने या ठिकाणी गतिरोधक घालावे अशी मागणी करण्यात येत आहे.