काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांचा दावा
वृत्तसंस्था/ कन्याकुमारी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी भाजपच्या ‘परिवार बचाओ’ टीकेवर प्रहार करताना, देशात भाजप-राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेले नुकसान भरून काढण्यासाठी भारत जोडो यात्रा काढली जात आहे, असे सांगितले. गुरुवारी कन्याकुमारी येथून सुरू झालेल्या यात्रेदरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांनी भाजप देशातील संस्थांवर ताबा मिळवून त्यांच्या विरोधात असलेल्यांवर दबाव आणत असल्याचा आरोप केला.
प्रत्येकाला मत असते, भाजपचे एक आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मत आहे. ते आपले मत ठेवण्यास मोकळे आहेत. आमच्यासाठी, काँग्रेससाठी हा प्रवास असून भारतात काय चालले आहे ते समजून घेण्याचा हा प्रयत्न आहे आणि भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
भाजपने देशातील संस्थांवर आपलेच लोक नेमले आहेत, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. जे त्यांच्या विरोधात आहेत त्यांच्यावर ते दबाव आणतात. आम्हाला राजकीय पक्षांशी लढण्याची सवय झाली आहे. आता हा लढा पक्षांमधील नाही. तो आता भारत देशाची रचना आणि विरोधक यांच्यात आहे. ही लढाई सोपी नाही आणि बरेच लोक लढू इच्छित नाहीत, असेही राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.