अध्याय सत्ताविसावा
भगवंत उद्धवाला भक्तिभावाचे महत्त्व समजावून सांगत आहेत. ते म्हणाले, भक्तिभावाने स्तवन केले असता देव भक्तांच्या अधीन होतो. याकरिता भक्तिभावानेच नमस्कार करून हरिचरणी मिठी घालावी. क्षणभर जर हरिचरणी मन सुखावले, तर त्या सुखाने इतर व्यवसाय सहजच खुंटतात. ज्यायोगे माझे अनुसंधान तुटेल, ते कर्म आपण सोडून द्यावे आणि ज्यायोगे मन स्वरूपनिष्ठ होऊन राहील, तसलेच समाधान राखावे. देहाभिमान टाकून, कसलाही अनमान न करता अहेतुकपणे लोटांगणे घालावीत. परंतु मी कर्ता आहे किंवा मी म्हणजे हा देह होय हे विसरणे सहजासहजी शक्य नसते, म्हणून भगवंत पुढे सांगतायत की, देहाकडे थोडेसे लक्ष ठेवूनही जो त्याचे मस्तक माझ्या चरणांवर ठेवतो आणि दोन्ही हातानी चरण धरून माझी प्रार्थना करून मला आळवतो त्याच्यावरही मी प्रसन्न होतो. माझी प्रार्थना करताना तो म्हणतो, ‘भगवान! या संसारसागरात मी बुडू लागलो आहे. मृत्यूरूपी मगर माझा पाठपुरावा करीत आहे. भयग्रस्त होऊन मी आपल्याला शरण आलो आहे. हे प्रभो! आपण माझे रक्षण करावे’ याबद्दल सविस्तर बोलताना भगवंत म्हणाले, भक्त माझ्या चरणावर मस्तक ठेवून माझे दोन्ही पाय दोन्ही हातांनी भक्तिभावाने धरतो आणि म्हणतो की, संसारसागराच्या पोटी मृत्युरूप नक्राने मला पकडले आहे म्हणून हे जगजेठी! मी लगबगीने तुमच्या पायाला लागलो आहे. या मगराच्या मिठीतून मला सोडवावे. संसाराच्या भयाने अत्यंत घाबरून गेलो असल्यामुळे मी तुला शरण आलो आहे. माझे जन्ममरण नाहीसे करावे. मी भक्तिभावाने तुमचे पूज्य चरण घट्ट धरले आहेत. आपल्यासारखे धनी माझ्या शिरावर असता बिचारा मृत्यु मला कसा मारणार! म्हणून भक्तिभावाने चरणांवर लोटांगण घालीत आहे. तर हे कृपाळुवा! कृपा करून आपण माझा उद्धार करावा. तो साष्टांग नमस्कार पाहून व भयभीत होऊन केलेले स्तवन ऐकून मी त्याच्यावर प्रसन्न होतो. अशा प्रकारे भक्तियुक्त अंत:करणाने माझ्या ठिकाणी नतमस्तक झाल्यावर मी दिलेला शेषप्रसाद आनंदाने शिरसी धारण करावा. जेथे प्रसिद्ध अचल (स्थावर) मूर्ती असेल, तेथे विसर्जनविधी करू नये परंतु जेथे चल (जंगम) प्रतिमामूर्ती असेल, तिच्यात ज्या आत्मज्योतीने आवाहन केले असेल, ती निजात्मज्योती पुन्हा आपल्या हृदयात आणून स्थापावी. याप्रमाणे विसर्जनापर्यंत पूजेचा विधी ऐकून उद्धवाच्या मनात आले की, साधकांनी पूज्य मूर्ती तरी कोणती म्हणून समजायची? हे उद्धवाचे मनोगत जाणून त्याविषयी देव स्वत: सांगत आहेत. ते म्हणाले, उद्धवा! अमुक एक मूर्ती पूजेसाठी योग्य किंवा अमुक एक अयोग्य असे काही नसते कारण सर्वत्र माझे अस्तिव आहेच. म्हणून जी मूर्ती ज्याला आवडली असेल, त्याने तिचे पूजन करावे. ह्या माझ्या सांगण्याबद्दल तू काडीमात्र संशय धरू नकोस. विष्णु, ब्रह्मदेव, सूर्य, शिव, शक्ती किंवा गणपती यापैकी कोणत्याही मूर्तीमध्ये मी सर्वात्मा समानच आहे. कोणत्याही प्रतिमेचे पूजन केले तरी ती पूजा मलाच पोहोचते. भक्तांचे प्रेम जिच्यात अधिक असते, त्याच्या अधीन मी परमात्मा असतो. मुलाबरोबर खेळताना आई ज्याप्रमाणे त्याच्याच धोरणाने खेळते, त्याप्रमाणे भक्तप्रेमाच्या लीलेनुसार मीही क्रीडा करितो. मी या सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी आणि अवतारादि लीलेने घेतलेल्या देहात अगदी सारखाच आहे, यात मुळीच संशय नाही. उद्धवा! मी नाही असे रिते ठिकाणच नाही पण प्राण्यांचे प्रारब्ध कसे असते पहा, मी सांगतोय त्यावर विश्वास ठेवून मला ते भजतच नाहीत! जो जेथे ज्या भावनेने माझे भजन करावयास बसतो, त्याला मी तेथे त्याच्या भावनेनुसार दिसू लागतो. उपासनामार्गाचे हे खरे रहस्य आहे. उपासनामार्ग प्रगट करण्याच्या निमित्ताने मी ते उघड केले. खरं म्हणजे माझी उपस्थिती सर्वत्र सारखीच असते हे रहस्य ज्यांना सहजी मान्य होत नाही. ते मूर्तीत माझे अस्तित्व आहे असे मानतात. त्यांच्यासाठीच मी मूर्तीपूजेचा विधी सांगितला.
क्रमश: