भाजपाला जातनिहाय गणना करण्याच्या मानसिकतेत नाही नसून त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही. त्यांना ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा कोट्यातूनच मराठा समाजाला आरक्षण द्यायचा घाट घातला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ओबीसींना मराठ्यांविरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न भाजप महाराष्ट्रात करत असून मराठा विरुद्ध ओबीसी यांच्यात वाद भडकवून भाजपाला महाराष्ट्रामध्ये मणिपूरची पुनरावृत्ती करायची असल्याचे आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केला आहे.
भारत जोडो’ पदयात्रेच्या वर्धापन दिनानिमित्त नागपुरात लोकसंवाद यात्रा काढण्यात आली. त्यापूर्वी पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यसरकारवर टिका केली. यावेळी माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, “२०१४ च्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे वचन दिले पण त्यांनी ते पाळले नाही. जर राज्यात आणि केंद्रात काँग्रेस सत्तेवर आली तर राज्यातील ओबीसी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवून कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार” असा दावाही त्यांनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यास मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचे आश्वासन दिल्यानंतर भाजपची २०१४ मध्ये केंद्रात आणि राज्यात सत्ता आली. आरक्षण तर मिळाले नाहीच उलट त्यांनी तत्कालीन महाधिवक्ता कुंभकोणी यांच्यावर दबाव आणला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षणाचे खोटे आश्वासन दिले आहे.” असल्याचा खुलासाही नाना पटोले य़ांनी दिला.