उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईमध्ये ठाकरेंना घेरण्यासाठी नविन रणनीती तयार करण्यासाठी मंबई दौऱ्यावर आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मुंबईचा पुढील महापौर भाजपचाच असेल असा विश्वास व्यक्त केला. आपल्या दोन दिवसीय महाराष्ट्राच्या दौऱ्यावर भाजपच्य़ा प्रदेशाध्यांनी मुंबई आणि राज्यातील अनेक प्रमुख नेत्यांसोबत बैठका घेतल्या. नड्डा यांनी लोकसभा आणि नागरी संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाच्या तयारीचा आढावा घेतला. याशिवाय येत्या निवडणूकांची रणनीती ठरवण्यासाठी शिवसेना (शिंदेगट) शी युतीबाबतही चर्चाही केली.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकासाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीवर राजकीय वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप पुर्ण तयारीने उतरत आहे. कांदिवली येथे बूथ- स्तरीय पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना नड्डा यांनी परत या मुद्द्याला हात घातला, ते म्हणाले, “महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांचा कार्यकाळात भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता वाढली होती. शिंदे- फडणवीस सरकारने राज्यात विकासाचे इंजिन आणले आहे. त्यामुळे मुंबईचा पुढचा महापौर भाजपचाच असेल. आणि हे साध्य करण्यासाठी सर्वांनी आपापल्या परिने योगदान दिले पाहिजे.” असे म्हटले आहे.
एकनाथ शिंदे बंडखोरीनंतर शिवसेनेची ताकतही विभागली गेली आहे. गेल्या दोन दशकांहून अधिक काळ मुंबई महानगर पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. पक्षात फूट पडूनही उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेचे बहुसंख्य नगरसेवक असून ती संख्या कमी करण्याचे भाजपचे ध्येय आहे.