पाटण्यातील संयुक्त विरोधी पक्षांच्या बैठकिला गेलो असता तेथिल परिस्थिती पाहून हासू आले. 17 विरोधी पक्ष असताना केवळ सातच विरोधी पक्षांनी तिथे उपस्थिती दाखवली असे बोलून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते प्रप्फुल्ल पटेल यांनी भाजप विरोधातील कॉग्रेसच्या राष्ट्रिय ऐक्याची खिल्ली उडवली. अजित पवार यांनी राष्ट्रवादीतील काही आमदारांना घेऊन शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांचा आज वांद्रे येथे मेळावा झाला या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे विधान केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “पाटणा येथे नुकत्याच झालेल्या विरोधी पक्षांची बैठक झाली. मीही शरद पवार यांच्यासोबत या बैठकीत गेलो होतो. तिथले दृश्य पाहून मला हसू आले. एकूण 17 विरोधी पक्षापैकी केवळ 7 पक्षच या बैठकीसाठी हजर होते. ज्या पक्षांचे लोकसभेत फक्त 1 खासदार आणि एक सदस्य आहे किंवा ज्या पक्षाचे शून्य खासदार आहेत असे पक्ष देशात बदल घडवून आणतील असा विरोधी पक्षाचा दावा आहे” असे बोलून त्यांनी विरोधी एकजूटीची खिल्ली उडवली. तसेच एनडीएमध्ये सामील होण्यासाठी घेतलेला हा निर्णय हा देशाच्या आणि पक्षाच्या हितासाठीच असून वैयक्तिक फायद्यासाठी नसल्याचे त्यानी म्हटले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले “शिवसेनेची विचारधारा आपण स्वीकारू शकतो, मग भाजपसोबत जायला काय हरकत आहे? आम्ही स्वतंत्र घटक म्हणून आम्ही या आघाडीत सहभागी झालो आहोत. मेहबूबा मुफ्ती आणि फारुख अब्दुल्ला जम्मू- काश्मीरमध्ये भाजपसोबत गेले आणि ते आता संयुक्त विरोधी पक्षाचा भाग आहेत,” असेही त्यांनी सांगितले.
शरद पवार आणि अजित पवार या दोघांनीही बुधवारी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका घेतल्या. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला 53 पैकी 31 आमदार उपस्थित होते. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेला केवळ दहा आमदार उपस्थित होते.