पंतप्रधान मोदींचे राजस्थानात वक्तव्य : गेहलोत केवळ सत्ता वाचविण्याच्या प्रयत्नात, काँग्रेस त्यांना हटविण्यात व्यग्र
वृत्तसंस्था/ चित्तौडगड
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी राजस्थानच्या चित्तौडगड येथे जात 7 हजरा कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा शुभारंभ केला आहे. यानंतर मोदींनी एका जाहीर सभेला संबोधित केले आहे. काँग्रेसने राजस्थानात खोटा प्रचार करून सरकार स्थापन केले, परंतु काँग्रेसला सरकार चालविता आले नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे उठता-बसता, झोपेत अन् जागेपणी मुख्यमंत्रिपद वाचविण्यासाठी प्रयत्न करत राहिले तर निम्मा काँग्रेस त्यांना पदावरून हटविण्यात व्यग्र राहिला, परंतु लूट करण्याप्रकरणी पूर्ण काँग्रेस एक होता अशी टीका मोदींनी केली आहे. राजस्थानची जनता भाजप सत्तेवर येईल आणि दंगली थांबवेल असा विश्वास व्यक्त करत असल्याचा दावा पंतप्रधान मोदींनी केला आहे.
गुन्हेगारीप्रकरणी राजस्थान पहिल्या स्थानावर असल्याचे अत्यंत दु:खी मनाने बोलावे लागत आहे. अराजकता, दंगली, दगडफेकीप्रकरणी आमचा राजस्थान बदनाम होतो. महिलांवरील अत्याचार, दलितांवरील अत्याचाराच्या अनेक घटना राजस्थानात मागील 5 वर्षांमध्ये घडल्या आहेत असे मोदींनी म्हटले आहे.
गेहलोतांना जाणीव
राजस्थानात काँग्रेस सरकारच्या निरोपाचे काउंटडाउन सुरू झाल्याची जाणीव गेहलोत यांना झाली आहे. दिल्लीत बसलेल्या लोकांना भरवसा नसला तरीही गेहलोत यांना सत्ता जाणार असल्याचे कळले आहे. याचमुळे गेहलोत हे आता भाजपने सरकार स्थापन केल्यावर आपल्या योजना बंद करू नयेत असे आवाहन करत आहेत. एकप्रकारे त्यांनी भाजपला शुभेच्छा दिल्या थ्आहेत. गेहलोत यांनी स्वत:चा पराजय प्रामाणिकपणे स्वीकारला आहे, मोदी त्यांच्यापेक्षा अनेक पटीने प्रामाणिक असल्याने गेहलोत सरकारने सुरू केलेल्या जनहिताच्या योजना भाजप सरकार आणखी प्रभावी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगू इच्छितो असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
लूट करणाऱ्यांवर कारवाई
शासकीय निधीवर डल्ला मारलेल्या तसेच भ्रष्टाचार करून गरीबांना त्रास देणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाणार ही मोदीची गॅरंटी आहे. या लोकांनी मोदीला कितीही शिव्या दिल्या तरीही भ्रष्टाचारावरील कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. जनतेच्या पैशाने स्वत:ची तिजोरी भरा अन् जनतेला वाऱ्यावर सोडा अशी काँग्रेस सरकारची अवस्था आहे अशी टीका मोदींनी केली आहे.
पेपर लीक माफियावर कारवाई
आम्ही यापूर्वी खाणमाफिया ऐकून होतो, परंतु राजस्थानात पेपर माफिया निर्माण झाले आहेत. तरुणाईच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना धडा शिकवू हा शब्द देत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत एकच चेहरा असून तो कमळाचा आहे. आमचा उमेदवार केवळ कमळ असल्याने एकजुटतेसोबत कमळाला विजयी करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी काम करावे असे मोदींनी म्हटले आहे.
उदयपूरमधील घटना धक्कादायक
उदयपूरमध्ये जे घडले त्याची कल्पना देखील कधी केली नव्हती. एका टेलरचा काही जण गळा चिरतात आणि त्याचा व्हिडिओ तयार करतात. राजस्थान तर शत्रूसोबत देखील असे वागत नाही. काँग्रेस सरकारला केवळ मतपेढी दिसून येते. परंतु काँग्रेसने राजस्थानची प्रतिमा आता बिघडवून टाकली आहे. राजस्थानात सणसमारंभ शांततेत साजरे करणे अवघड ठरले आहे, कधी दंगली भडकतील आणि दगडफेक सुरू होईल याची शाश्वती राहिली नसल्याचा आरोप मोदींनी केला आहे.
मुलींवर अन्याय
राजस्थानातील बाडमेर, जमवारागढ, भीलवाडामध्ये मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या. याचमुळे येथील बहिणी-मुली आता भाजपला सत्तेवर आणण्याचा निश्चय करत आहेत. मोदी बहिणी-मुलींना देण्यात आलेली प्रत्येक गॅरंटी पूर्ण करत असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी म्हटले आहे.