तिसरी टी-20 लढत आज, भारतीय पेसर्स, आघाडी फळीच्या कामगिरीवर लक्ष
वृत्तसंस्था/ राजकोट
भारत व लंका यांच्यातील तिसरी व शेवटची टी-20 लढत आज येथे होत असून दुसऱया सामन्यात भारताच्या युवा गोलंदाजांकडून निष्प्रभ कामगिरी झाली होती, त्याची भरपाई करण्याचा ते निश्चितच प्रयत्न करतील. तसेच भारताची आघाडी फळीही लवकर कोसळली होती. त्यामुळे हे फलंदाजही सुधारित प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतील. सायंकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होत असून स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरून त्याचे थेट प्रक्षेपण होईल.
पहिल्या सामन्यात भारताने शेवटच्या चेंडूवर निसटता विजय मिळविला, त्यानंतर दुसऱया सामन्यात लंकेने 16 धावांनी विजय मिळवित मालिका 1-1 अशी बरोबरीत आणल्यामुळे या तिसऱया सामन्याला निर्णायक स्वरूप प्राप्त झाले आहे. युवा गोलंदाजांच्या कामगिरीतील सातत्याचा अभाव, हे दुसऱया सामन्यातील पराभवाचे एक कारण होते. पण उमरान मलिक व शिवम मावी यांच्यासाठी हा सामना नवा अनुभव देणारा ठरला. अचूक दिशा राखण्यात त्यांनी चूक केली आणि वारंवार फुलर लेंग्थ चेंडू टाकण्यात ते कमी पडले. त्यामुळे लंकन फलंदाजांचे काम सोपे झाले. उसळत्या चेंडूवर त्यांना वेगाचा उपयोग करून जलद धावा करता आल्या.
दुखापतीनंतर पुनरागमन केलेल्या अर्शदीप सिंगने केवळ दोन षटकातच 5 नोबॉल्स टाकण्याचा ‘अपराध’ केला असून त्याच्या नावावर नकोसा असलेला हा विक्रम नोंद झाला आहे. पहिल्या षटकात सलग तीनवेळा त्याने ओव्हरस्टेप केल्याने टी-20 मध्ये नोबॉल्सची हॅट्ट्रिक नोंदवणारा तो भारताचा पहिला गोलंदाज बनला. पहिल्या सामन्यात सनसनाटी पदार्पण करणाऱया शिवम मावीने कर्णधार हार्दिकसह नोबॉल्समध्ये आणखी भर घातली. हार्दिकनेही नंतर संघाने मूलभूत गोष्टी योग्य प्रकारे करण्याची गरज असल्याचे म्हटले. मात्र त्यांना अनुभव मिळत असल्याने त्यांना आणखी संधी दिली जाणार आहे. ‘या युवा खेळाडूंना असे सामने मिळत राहतील. त्यांच्याकडून एकदम अपेक्षा न करता संयम बाळगणे आवश्यक आहे. पण असे सामने वारंवार होत नसतात हेही आम्ही समजून घ्यायला हवे,’ असे प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाले. ते शिकत असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शिकता येणे सोपे नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत संयम राखला जावा, असेही ते म्हणाले.
फलंदाजीच्या आघाडीवर भारताला पुन्हा एकदा भक्कम सुरुवात करून देणे जमले नाही. गिल सलग दुसऱया सामन्यात अपयशी ठरला आणि मिळालेल्या आणखी एका संधीचा तो निश्चितच उपयोग करून घेईल, अशी अपेक्षा आहे. राहुल त्रिपाठीही पदार्पणाच्या सामन्यात अपयशी ठरला. ही कसर भरून काढण्याचा तोही निश्चितच प्रयत्न करेल. या मालिकेत दुसऱयांदा भारतीय आघाडी फळी लवकर बाद झाली होती.
निम्मा संघ 60 धावांच्या आत तंबूत परतल्यानंतरही भारताने आव्हानाचा पाठलाग सोडला नाही, याचा सर्वांना आनंद झाला. अक्षर पटेल व सूर्यकुमार यादव यांनी आपल्या धडाकेबाज फटकेबाजीने सामना जवळपास जिंकूनच दिला होता. अक्षरच्या रूपात भारताला जडेजासारखा स्पिनर अष्टपैलू मिळाला आहे. भारतीय टी-20 संघ विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या पलीकडे जाऊन तयारी करीत असून पुढील वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या प्रमुख खेळाडूंना जास्तीत जास्त सामने दिले जाणार आहेत. या निर्णायक सामन्यात संघामध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. संघामध्ये आम्ही वारंवार बदल करणार नाही, असे प्रशिक्षक द्रविड यांनी म्हटले आहे.
आशिया चषक विजेत्या लंकेने अपेक्षेप्रमाणे भारताला जोरदार टक्कर दिली असून दुसरा सामना जिंकून त्यांनी मालिकेत बरोबरी साधली. मात्र त्यांच्या मधल्या फळीकडून अपेक्षित कामगिरी झाली नसल्याने त्यांच्या कामगिरीत सुधारणा होण्याची त्यांनी अपेक्षा केली आहे. राजकोटची खेळपट्टी देशातील सर्वात फ्लॅट खेळपट्टय़ांपैकी एक असल्याने त्यावर धावांची बरसात होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे नाणेफेक महत्त्वाची ठरणार असून दोन्ही कर्णधार आव्हानाचा पाठलाग करणे पसंत करतील, अशी अपेक्षा आहे.
संभाव्य संघ ः भारत ः हार्दिक पंडय़ा (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), इशान किशन, गायकवाड, गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा, सुंदर, चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार.
लंका ः दसुन शनाका (कर्णधार), निसांका, अविष्का फर्नांडो, समरविक्रमा, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, असालंका, धनंजय डिसिल्वा, हसरंगा, अशेन बंदारा, तीक्षणा, करुणारत्ने, मधुशन्का, रजिता, लेलालगे, प्रमोद मधुशान, लाहिरु कुमारा, नुवान तुषारा.
सामन्याची वेळ ः सायंकाळी 7 पासून थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्क