अध्याय चोविसावा
भगवंत म्हणाले, उद्धवा प्रकृतीपुरुषासह हे जे साकार चराचर दिसते, ते सुरवातीपासून शेवटपर्यंत नश्वर आहे. त्यामुळे आधी अमुक एक गोष्ट होती, आता ती नाही म्हणून मनुष्य शोक करत असतो त्याला काही अर्थ नाही कारण समोर दिसणारी कोणतीही गोष्ट ही कधी ना कधी नाश पावणारीच आहे. मग तो प्रकृतीत बीज पेरणारा पुरुष असो वा ते प्रसवणारी प्रकृती असो, नाश हा व्हायचाच. प्रकृती आणि पुरुष सृष्टीनिर्मिती करतात पण त्यांना परमेश्वर जशी प्रेरणा देतो त्याप्रमाणेच हे घडते. त्याच्या प्रेरणेनेच समोरच्या आकृत्या तयार होतात. त्या सर्वात कधीही नष्ट न होणारे ईश्वरी तत्व कायम असते. ज्याप्रमाणे दागिना करावयाच्या आधी जे सोने असते तेच दागिना मोडला तरीही कायम राहते आणि मध्यंतरीही तेच शुद्ध सोने दागिन्याच्या रूपाने भासत असते. मातीची खेळणी करावयाच्या आधी केवळ मातीच असते आणि खेळणी पूर्णपणे मोडली म्हणजेही निखालस मातीच शिल्लक राहते. त्याप्रमाणे आदी, मध्ये व अंतीही अविनाशी ब्रह्मतत्वच निरनिराळय़ा आकारात दिसत असते. ज्याचे त्रिगुण सारख्या प्रमाणात असतात त्याला प्रत्येक गोष्टीतील, अविनाशी अशा ब्रह्मतत्वाची जाणीव होत असते. तीन गुणांच्या प्रभावाने हे निरनिराळे आकार धारण केलेले असतात. त्यामुळे एकचएक ब्रह्म सर्वत्र भरून राहिलेले आहे ह्या सहजावस्थेचा विसर पडून अनैसर्गिक म्हणजे विकृत असे हे जग साकार दिसते, ते सर्व चराचर, ज्याप्रमाणे स्वप्नातील व्यवहार केवळ मायिक असतो त्याप्रमाणे मायिक होय. सर्व विकारांचे कारण अविद्या हेच आहे. ते विकार जर खरे आहेत असे मानले तर अविद्येलाच खरेपणा येऊ लागेल. अविद्या ही आपल्याच नावाने आपला अस्तित्वरहितपणा आपणच सांगते. हे वर्म, ज्ञाते लोक जाणतात परंतु अज्ञानी लोक ते समजून न घेता अविद्येलाच सत्य मानतात. अविद्या ही अविद्यकत्वामुळे मिथ्या आहे आणि ब्रह्म हे ब्रह्मत्वामुळेच सर्वदा संपन्न आहे. ज्याप्रमाणे निदेच्या योगाने आपण स्वप्नांमध्ये वस्तुतः एकच असताना अनेक होतो, त्याप्रमाणे प्रकृतीचा अंगीकार केल्यामुळेच ब्रह्मापासून अनेक लोक होतात. ज्याप्रमाणे तंतूपासून कोटय़वधि वस्त्रे होतात, तरी त्या कोटय़वधि वस्त्रांमध्ये तंतु एकसारखा एकच एक असतो. तसेच वस्त्राचा आदि, मध्य किंवा शेवट पाहिला तरी तंतूखेरीज दुसऱया पदार्थाचे दुजेपणाचे बोटही शिरकलेले दिसत नाही. त्याप्रमाणे प्रकृतीपुरुषादि सर्व लोक परमात्म्यापासूनच उत्पन्न झाले आहेत. त्यामुळे ते आदी, मध्ये व अंती एका परब्रह्म स्वरूपाचेच आहेत. त्यांत द्वैताची गोष्टसुद्धा असत नाही. तंतु खरा असून वस्त्र हे मायिक असते, त्याप्रमाणे परब्रह्म खरे असून माया ही लटकी आहे. उद्धवा जे आदी, मध्य व अंती एकच असते तेच शुद्ध सत्य होय. ज्याप्रमाणे लाकडाची बाहुलीचे अवयव लाकडाचेच असतात, त्याप्रमाणे ब्रह्म हे ब्रह्मस्वरूपाने एकच असून जगाच्या रूपाने शोभा पावले आहे. हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी भगवंत निरनिराळी उदाहरणे देत आहेत. जेणेकरून कुणाच्याही मनात काहीही शंका राहू नयेत. ते म्हणाले, ज्याप्रमाणे देह हा एकटा एक असून तो निरनिराळय़ा अवयवरूपांनी अनेक प्रकारचा दिसतो, त्याप्रमाणे ब्रह्मही एकटेएकच असून ते अनेक स्वरूपांनी भासते. ज्याप्रमाणे पाण्यामध्ये पाणीच खेळत असता ते तरंगांच्या अनेक मालिका उत्पन्न करते, त्याप्रमाणे परब्रह्माच्या लीलेनेच जगत् इत्यादि सर्व वस्तुसमुदाय प्रगट होतो. तरंगांच्या आदी, मध्ये व अंती जसे पाण्याच्या रूपाने पाणीच असते, त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती व लय ह्यांमध्ये ब्रह्म हे ब्रह्मरूपानेच अविनाशी असते. म्हणून ब्रह्म हे सत्य आहे आणि प्रपंच हा मिथ्या आहे, हा विचार साधकांना समजण्यासाठी कार्यकारणामध्ये अभिन्नभावच आहे. कार्य जर कारणाशी अभिन्न (एकरूप) आहे, तर ब्रह्मामध्ये माया ही भिन्न कशी? अशी शंका येईल, ती दूर करण्यासाठीच ब्रह्म हेच जगदूरूपाने परिपूर्ण नटलेले आहे, असे पर्यायाने भगवंतांनी दाखवून दिले.
क्रमशः