चौदा वर्षांच्या खडानंतर भारताला पहिले पदक मिळविण्यात यश
वृत्तसंस्था/ इस्फाहन, इराण
18 वर्षांखालील वयोगटाच्या आशियाई मुलांच्या व्हॉलीबॉल चॅम्पियनशिपमध्ये भारताने 14 वर्षांच्या खंडानंतर पहिले यश मिळविले असून येथे झालेल्या स्पर्धेत भारतीय मुलांनी कांस्यपदक पटकावले.
कांस्यपदकासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत भारतीय मुलांनी दक्षिण कोरियाचा 3-2 अशा फरकाने निसटता पराभव करीत पोडियमवर येण्याचा मान मिळविला. या लढतीच्या प्रारंभीच्या टप्प्यात भारतानेच वर्चस्व राखत पहिले दोन सेट 25-20, 25-21 अशा गुणांनी जिंकले. दक्षिण कोरियाने नंतर जोरदार मुसंडी मारत तिसरा सेट 28-26 अशा निसटत्या फरकाने जिंकला आणि नंतर चौथा सेट 25-19 असा जिंकत भारताशी 2-2 अशी बरोबरी साधली. निर्णायक पाचव्या सेटमध्ये भारताने दडपण असूनही शानदार खेळ करीत हा सेट 15-12 असा जिंकून कांस्यपदक निश्चित केले.
गेल्या चौदा वर्षात या स्पर्धेत भारतीय मुलांनी मिळविलेले हे पहिलेच पदक आहे. त्याआधी 2008 मध्ये या स्पर्धेत भारताने चीनला 3-2 असे हरवून कांस्यपदक मिळविले होते. यू-18 आशियाई मुलांच्या व्हॉलीबॉल चॅम्पियनशिपमध्ये भारताने आतापर्यंत पाच पदके जिंकली आहेत. 2003 मध्ये विशाखापट्टणम येथे झालेल्या स्पर्धेत भारताने सुवर्ण मिळविले होते. त्यानंतर 2005 व 2007 मध्ये झालेल्या स्पर्धेत कांस्य व रौप्य मिळविले होते. या स्पर्धेतील कामगिरीमुळे 2023 मध्ये होणाऱया यू-19 व्हॉलीबॉल वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघ पात्र ठरला आहे.