ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लि. आणखी 20 हजार कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करणार आहे. बीएसएनएलच्या एम्प्लॉईज युनियनने हा दावा केला आहे.
कंपनीने माघार प्रक्रियेत यापूर्वीच 30 हजार कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले आहे. तर सध्याचे कंत्राटी कामगार एक वर्षाहून अधिक काळ बिनपगारी राहिले आहेत, असेही युनियनने म्हटले आहे.
बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पी. के. पुरवार यांना लिहिलेल्या पत्रात युनियनने म्हटले आहे की, स्वेच्छानिवृत्ती योजनेनंतर कंपनीची आर्थिक स्थिती आणखी बिघडली आहे. विविध शहरांमध्ये मनुष्यबळाच्या अभावामुळे नेटवर्कमधील अपयश वाढले आहे. युनियनने सांगितले की, व्हीआरएसनंतरही बीएसएनएल आपल्या कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देऊ शकत नाही. युनियनने सांगितले की, गेल्या 14 महिन्यांपासून पैसे न दिल्याने 13 कंत्राटी कामगारांनी आत्महत्या केली आहे. असे असूनही कामगारांना योग्य तारखेला वेतन देता आले नाही.