….अन्यथा १५ ऑगस्ट रोजी उपोषण छेडण्याचा इशारा
ओटवणे प्रतिनिधी
झोळंबे गावात बीएसएनएलच्या नेटवर्कसह डेटा नेटवर्क सेवा वारंवार विस्कळीत होत असल्यामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याबाबत संबंधित खात्याचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात येते. त्यामुळे येत्या १४ ऑगस्टपर्यंत फुकेरी टॉवर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित न केल्यास तसेच झोळंबे गावातील प्रस्तावित टॉवरबाबत कार्यवाही न केल्यास १५ ऑगस्ट रोजी उपोषण छेडण्याचा इशारा झोळंबे ग्रामपंचायतीच्या सरपंच विशाखा नाईक, उपसरपंच विनायक गाडगीळ, माजी सरपंच सतिश कामत यांनी एका निवेदनाद्वारे बीएसएनएलच्या अधिकारी वर्गाला दिला.
झोळंबे गावात गेल्या काही दिवसांपासून बीएसएनएलच्या नेटवर्कसह डेटा नेटवर्कचा बोजवारा उडालेला आहे. यात ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. त्यामुळे या सेवेमध्ये असलेल्या त्रुटी शोधुन सुरळीत मोबाईल नेटवर्कची सुविधा द्या. अशी ग्राहकांची मागणी आहे. बीएसएनएलच्या या अनागोंदी कारभारामुळे गावात सेवा उपलब्ध असूनही त्या मिळत नाहीत. त्यामुळे ग्राहकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शासनाच्या संगणकीय प्रणालीच्या सक्तीमुळे ऑफलाईन सेवा देता येत नाही. त्यामुळे गावातील संबंधित अधिकारी कर्मचारी आणि ग्राहक यांच्यामध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात. पर्यायाने संबंधितांना ग्राहकांच्या रोशाला सामोरे जावे लागत आहे.
याबाबत बीएसएनएलचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष करण्यात आल्याने अखेर झोळंबे ग्रामपंचायतीच्या सरपंच विशाखा नाईक, उपसरपंच विनायक गाडगीळ, माजी सरपंच सतिश कामत यांनी बीएसएनएलचे सावंतवाडीतील जिल्हा कार्यालय गाठून बीएसएनएलचे डेप्युटी जनरल मॅनेजर श्री. जानु आणि मोबाईल डिपार्टमेंट प्रमुख श्री. देशमुख त्यांच्यासमोर बीएसएनएलच्या विस्कळीत सेवेमुळे सामोरे जावा लागणाऱ्या समस्यांचा पाढाच वाचला. तसेच याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल याचा जाब विचारला. तसेच फुकेरी टाॅवर पूर्ण क्षमतेने त्वरीत कार्यान्वित करण्यासह झोळंबे येथील प्रस्तावित मोबाईल टाॅवर बाबत त्वरित कार्यवाही करावी अन्यथा १५ ऑगस्ट रोजी कार्यालयासमोर झोळंबेवासियांसह उपोषण छेडण्याचा इशारा दिला.