अध्याय सत्ताविसावा
देव लवकर कसा प्रसन्न होईल ते भगवंत सांगत आहेत. ते म्हणतात, पर्वणीच्या दिवशी माझी पूजा, नैवेद्य, होमहवन, ध्यान झाल्यावर माझ्या लीलांचे कीर्तन मांडावे. त्यात माझ्या लीलांचे गायन करावे, त्यांचे वर्णन करावे आणि माझ्या लीलांचा अभिनय करावा. हे सर्व करताना प्रेमोन्मत्त होऊन नाचावे. माझ्या कथा स्वत: ऐकाव्यात, दुसऱ्यांना ऐकवाव्यात आणि हे करताना प्रपंचाला काही वेळापुरते तरी विसरून जावे. ज्याचे चित्त माझ्यात खरोखर गुंतलेले असते तोच स्वत:ला विसरू शकतो. ज्ञान, ध्यान, उपासना ही सारी गौण होत. देव हा भावाचा भोक्ता आहे. देव हा भावानेच भेटतो. मन ध्यानातून निसटले तर माझे नामस्मरण करावे किंवा आदरपूर्वक माझ्या गुणांचे श्रवण करावे. हरिगुणांचे किंवा हरीच्या यशाचे श्रवण केले असता अंत:करणाला सुख होते. त्या सुखाने सुखभरित होऊन आपण स्वत:च हरिकीर्तन करावे. कीर्तनात श्रोत्यांना माझ्या कथा ऐकवाव्यात. त्यात माझ्या लीलांचा समावेश असावा. त्यांचे वर्णन करताना मी माझ्या भक्तांच्यावर आलेल्या संकटात त्यांचा तारणहार कसा होतो ते सविस्तर सांगावे. हे सर्व ऐकून माझ्यावरचा श्रोत्यांचा विश्वास अधिक कसा वाढेल यावर जोर ठेवावा. अशा प्रकारे माझे कीर्तन करणारा माझा भक्त माझा अत्यंत लाडका होतो. कीर्तनकार गायन, नर्तन आदि कळत वाकबगार असतो. त्यांची कीर्तन करण्याची पद्धती भक्ताने समजून घ्यावी. ती अंगवळणी पडण्यासाठी निर्लज्ज सोंगाड्याप्रमाणे हरीच्या सभामंडपांत नाचू लागावे, मोठ्या कुशलतेने हावभाव करून हरीची लीला कर्मे दाखवावी. गोवर्धनपर्वत कसा उचलला त्याचा अभिनय स्वत:च करून दाखवावा किंवा मोठ्या अवसानाने बैठक मारून शंकराचे धनुष्य रामाने कसे मोडले ते दाखवावे. पूतनेचे प्राणहरण, कुवलयहत्तीचा संहार किंवा मल्लमर्दन कसे केले ते दाखवून हरिकीर्तन करावे. प्रेमाचा आविर्भाव विलक्षण असतो. त्यात गद्य, पद्य, नामप्रबंध, भुजंगप्रयातादि छंद म्हणून भक्त आनंदाने स्तुतिस्तोत्रं गात असतो. प्राचीन ऋषींनी किंवा सामान्य भक्तांनी रचलेल्या लहानमोठ्या स्तोत्रांनी माझी स्तुती करून प्रार्थना करावी की, ‘हे भगवान! आपण प्रसन्न व्हावे’ असे म्हणून साष्टांग दंडवत घालावा. संस्कृत येत नसल्याने किंवा योग्य व्यक्तीकडून स्तोत्र कसे म्हणावे याचे शिक्षण न मिळाल्याने शुद्ध रीतीने स्तोत्रपठण करिता आले नाही किंवा गाणेही शिकलेले नसल्याने ते तालासुरात म्हणता आले नाही, तरी ते प्रेमाने म्हणणाऱ्याला दोष तर लागत नाहीच, उलट त्याच्यायोगाने महादोषाचे निर्दालनच होत असते. वेदातील उपनिषदांचे पठण किंवा ऋचामंत्रांनी हरीचे स्तवन, ह्यामध्ये काही लोक श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद करतात परंतु भक्त ते म्हणत असताना जो भक्तिभाव प्रकट करतो तो देवाला जास्त प्रिय असल्याने त्याच्या दृष्टीने श्रेष्ठ कनिष्ठ असे काहीही नसते. दोन्हीही त्याला सारखीच प्रिय आहेत. म्हणून इतर भक्त माझी स्तुतिस्तोत्रं व पुराणे याबद्दल सांगत असताना किंवा स्तोत्रे म्हणत असताना ती आदरपूर्वक श्रवण करावी. भक्ताने स्वत: हरिकथेचे मर्म समजावून घ्यावे आणि कोणी श्रोते मिळाल्यास कथेचे निरूपण करावे. माझे नाम घेऊन मला प्रेमाने हाक मारलेली मला फार आवडते किंबहुना असे मला कोण हाक मारण्याची मी आतुरतेने वाटच पहात असतो. परंतु मनुष्य एकदा मायेच्या भोवऱ्यात सापडला की तो स्वत:ला कर्ता समजत असल्याने त्याला माझी आठवणच होत नाही. मग ज्याला माझी आठवण होते तो प्रेमाने मला माझे नाव घेऊन मला हाक मारू लागतो आणि त्याच्या अडीअडचणीच्या वेळी मी स्वत:हून धावत जातो. म्हणून सांगतो की, पुराणातील मोठे थोरले स्तोत्र म्हटले काय आणि फक्त नाम घेतले काय, अर्थाने आणि भावाने खरोखर मी ती सारखीच मानतो. एखादा भोळाभाबडा मनुष्य असून त्याला वेद, शास्त्र, पुराण काहीच कळत नसले आणि त्याने त्याच्या भाषेतच स्तवन केले, तरीसुद्धा मी श्रीकृष्ण संतुष्ट होतो.