हुबळी-तारीहाळ येथील घटना : पाचजण जखमी
वार्ताहर /हुबळी
तारीहाळ येथील औद्योगिक वसाहतीमधील मेणबत्ती व स्पार्कर तयार होणाऱया कारखान्यात शनिवारी आग लागून स्फोट झाला होता. या दुर्घटनेत 8 कामगार गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, उपचार सुरु असतानाच तीन कामगारांचा मृत्यू झाला.
शनिवारी मध्यरात्री 90 टक्के भाजून गंभीररित्या जखमी झालेल्या विजयलक्ष्मी वीरभद्र एच्चन्नवर (वय 34) यांचा मृत्यू झाला होता. रविवारी सकाळी 80 टक्के भाजलेल्या गौरम्मा वीरभद्रय्या हिरेमठ (वय 45, रा. तारीहाळ) आणि 75 टक्के भाजलेल्या मालेश बसप्पा हदेनवर (वय 27, रा. लिंगनकोप्प, ता. कलघटगी) या दोघांचा मृत्यू झाला. त्यानुसार मृतांचा आकडा तीनवर पोहोचला असल्याची माहिती किम्सचे सचिव डॉ. रामलिंगप्पा यांनी दिली.
इतर जखमी कामगार मल्लिक रेहान कोप्पद (वय 18), निर्मला हुच्चन्नवर (वय 29), चेन्नव्वा अरिमाळ (वय 42), प्रेमा अरिमाळ (वय 20) आणि नाणिम्मा पडदार (वय 35) यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. दरम्यान, अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली जात आहे.
मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी 5 लाखांची भरपाई
महिला आणि बालकल्याण मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री हालप्पा आचार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, या घटनेमध्ये आठजण जखमी झाले असून त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या वारसदारांना राज्य सरकार प्रत्येकी 5 लाख रुपयांची भरपाई देणार आहे. या घटनेला कारणीभूत असलेल्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. अनधिकृतपणे चालवित असलेल्या कारखान्यांची तीन दिवसांत पाहणी करण्याची सूचना अधिकाऱयांना केली आहे, असे त्यांनी सांगितले.