80 ते 90 रुपये किलो काजू : समाधानकारक दर नसल्याने नाराजी
बेळगाव : काजू हंगाम अंतिम टप्प्यात आला तरी अद्याप समाधानकारक दर मिळत नसल्याने उत्पादक चिंतेत आहेत. सध्या बाजारात 80 ते 90 रुपये प्रतिकिलो दर सुरू आहे. शेतकऱ्यांना मागील दोन वर्षांत केवळ 70 ते 80 रुपये प्रतिकिलोवर समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे यंदादेखील काजू उत्पादकांची मोठी निराशा झाली आहे. अलीकडे काजू बागायती क्षेत्र वाढले आहे. विशेषत: जिल्ह्यात खानापूर आणि बेळगाव तालुक्यात अधिक क्षेत्र आहे. लागवड क्षेत्र वाढल्याने साहजीकच उत्पादनातही वाढ होऊ लागली आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या अपेक्षेप्रमाणे दर मिळत नसल्याने मिळेल त्या दराला काजू विकण्याची वेळ येऊ लागली आहे. प्रशासनाकडून हमीभावही मिळत नसल्याने दलाल आणि व्यापारीच ठरवतील तो भाव शेतकऱ्यांना मान्य करावा लागत आहे. त्यामुळे काजू दराचे भिजत घोंगडे कायम आहे. जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक शेतकरी बागायती शेती करतात. आंबा, काजू, केळी, डाळिंब, द्राक्षे आदींचा समावेश आहे. यंदा पूरक वातावरणामुळे काजू उत्पादनात वाढ झाली आहे. मात्र, अपेक्षेप्रमाणे दर नसल्याने काजू घरातच पडून असल्याचे दिसत आहे. त्यामुळे काजू विकावे कधी? असा प्रश्नही उत्पादकांसमोर आहे. गतवर्षी 80 ते 90 रुपये तर दोन वर्षांपूर्वी 125 रुपये प्रतिकिलो दर झाला होता. यंदादेखील 125 रुपये दर व्हावा, अशी अपेक्षा काजू उत्पादक शेतकऱ्यांची आहे. मात्र, हंगाम अंतिम टप्प्याकडे येत असला तरी दर 80 ते 90 रुपये किलोपर्यंतच रेंगाळत आहे.