घाट-जंगल भागात उपाययोजना : रेल्वेमार्गाची ठिकठिकाणी दुरुस्ती
बेळगाव : नैर्त्रुत्य रेल्वेकडून पावसाळ्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून दुरुस्तीचे काम केले जात आहे. धुवाँधार पावसात काही ठिकाणी रेल्वेमार्गावर दरड कोसळणे, धोकादायक झाडे कोसळणे, त्याचबरोबर ट्रॅकखालील माती वाहून जाणे, असे प्रकार होत असतात. त्यासाठी अशा धोकादायक ठिकाणी पाणी साचू नये, याची खबरदारी रेल्वे विभागाकडून घेतली जात आहे. नैर्त्रुत्य रेल्वे विभागात अनेक ठिकाणी घाटमाथे आहेत. पावसाळ्याच्या दिवसात डोंगरातील वाहून आलेली माती थेट रेल्वेरूळावर येते. यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प होते. याचबरोबर ज्याठिकाणी माती कमकुवत आहे, तेथे दरड कोसळण्याची भीती असते. मागीलवर्षी बेळगाव-वास्को मार्गावरील दूधसागर धबधब्यानजीक दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. असे प्रकार घडू नयेत यासाठी ज्याठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे, त्याठिकाणी तारेचे कुंपण लावले जात आहे. काही ठिकाणी डोंगरातील माती वाहून येते. अशा ठिकाणी मातीने भरलेल्या पोत्यांची भिंत उभारली जात आहे. रेल्वेरूळापर्यंत पावसाचे पाणी पोहोचू नये याकरिता इतर मार्गाने ते पाणी वळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. बेळगाव-हुबळी मार्गावर काही ठिकाणी जंगल लागते. लोंढा परिसरात अनेक जुनाट वृक्ष असून ते रेल्वेमार्गावर कोसळण्याची शक्यता असल्याने हटविण्याचे काम नैर्त्रुत्य रेल्वेकडून केले जात आहे.